
संपादक – राजेंद्र तासकर
कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या वारसांना शासनाने ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने देण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.त्यांच्या या मागणीवरून अखेर शासनाने कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्यात जानेवारी २०२० पासून कोरोना (कोविड-१९ ) महामारीचा प्रकोप सुरू झाला. असंख्य निराधार,तरूण,वृध्द व्यक्तींना कोरोनाची लागण झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकट काळात देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतली.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक लोकांना कोरोना संसर्ग झाला होता.कोरोनाबाधित रूग्णांनी मिळेल तेथे महागडी उपचार सुविधा घेतली.औषधांचा तुटवडा असतानाही रूग्णांना वाचविण्यांसाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,त्यात शेकडो रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.त्यात अनेक कुटुंबातील कर्ते लोक मृत्युमुखी पडले.त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील अन्य सदस्य मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना दैनंदिन चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यात मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे अशा कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाने मदत करावी,अशी मागणी केली होती.त्यानुसार शासनाने कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या जवळच्यानातेवाईकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आला आहे.
शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शासन स्तरावर आवश्यक त्या कागदपत्रासह सदर मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत.मात्र, अद्यापही त्यांना सदरील सानुग्रह अनुदान मिळालेले नाही.ते तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश आले आहे. कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ४ हजार अर्जदारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या अथक प्रयत्नामुळे शासनाने कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी २० कोटीचा निधी मंजूर केल्याने जनतेत समाधान व्यक्त केले आहे.तसेच याबद्दल शासनाचे आणि स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.