
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील १०० सायकल स्वारांनी श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) अशी २३०० किलोमीटरची सायकल वारी २३ दिवसांत पूर्ण केली.यामध्ये कोपरगाव सायकल ग्रुपचे सदस्य प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांनी सुद्धा सहभाग नोंदवून ही सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली.त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी निकुंभ व सालके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तसेच कोपरगाव तालुका क्रीडा संकुल व कोपरगाव सायकल ग्रुपच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,प्रसाद नाईक,प्रशांत होन, संदीप देवकर,बापूसाहेब सुराळकर, विवेक खांडेकर,दिनेश कोल्हे,दिगंबर बनकर,योगेश देशमुख,संतोष नेरे, शरद कदम,आकाश वडांगळे,चेतन भास्कर आदी उपस्थित होते.
संत नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूरपासून पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र घुमानपर्यंत सायकल वारीचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.पंढरपूर आणि घुमान या दोन्ही तीर्थस्थळांना मोठा अध्यात्मिक वारसा आहे.या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यान काढण्यात आलेल्या या सायकल वारीमध्ये महाराष्ट्रातील शंभर सायकल पटू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.त्यात कोपरगाव सायकल ग्रुपचे सदस्य प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांचाही समावेश होता.त्यांनी ही सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.