
कोपरगाव कराच्या पदरी निकृष्ट कामामुळे धूळ,खड्डे व अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी खंत व्यक्त केली

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील प्रभागात आज (दि.११डिसेंबर२३) रोजी करण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ, मैला,शेवाळ मिश्रित,गटारीचे (ड्रेनेज)चे काळे पाणी असलेले पिण्याचे पाणी म्हणून पूरवठा करण्यात आला सदर पाण्याचा अतिशय घाण वास येत असल्याने पालिका प्रशासना विरोधात नागरिकांसह महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेचा कारभार प्रशासक पाहत असल्याने कोणाचाच कोणावर वचक नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव कराच्या पदरी निकृष्ट कामामुळे धूळ,खड्डे व अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी खंत व्यक्त केली.

आपल्या प्रसिध्दी पत्रकात श्री.पाटील पुढे म्हणाले की,शहरातील विविध प्रभागात सर्वच ठिकाणी अतिशय गाळयुक्त काळे पाणी वितरित करण्यात येत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आधीच शहरात मोठ्या प्रमाणावर डासांनी उच्छाद मांडलेला असताना गढूळ,गाळ मिश्रित दूषित पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला आहे,जणू काही प्रशासनाला शहरवासियांच्या आरोग्याशी खेळ खेळून नागरिकांचा अंत पाहण्यात समाधान वाटते की काय ?असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.परंतु, त्यामुळे अतिसार,डेंग्यू,कावीळ,थंडी ताप,सर्दी,पडसे खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणारी साफसफाई ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले,नगरपालिका सध्या आठ दिवसात पाणीपुरवठा करीत आहे त्यामुळे वर्षाकाठी केवळ 48 दिवस पाणी पुरवठा करण्यात येतो व पाणीपट्टी मात्र संपूर्ण वर्षाची घेतली जाते या गंभीर समस्ये कडे ना कोणी लक्ष देत आहे,ना कोणी आवाज उठवताना दिसत आहे अशीही खंत माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केली.
प्रशासक म्हणून मुख्याधिकारी शांताराम गोसावी सध्या काम पाहत आहेत, त्यांच्याकडे तक्रारींचा मोठा साठा साचला असून त्याचा निपटारा होत नसल्याने व शहरातील कामे अतिशय संथ गतीने होताना दिसत आहेत,ना मुख्याधिकारी कोणत्या प्रभागात भेट देतात अथवा असलेल्या समस्यांचा निपटारा करीत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत,यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे कि,ना मुख्याधिकाऱ्यांवर कोणाचा वचक,ना मुख्याधिकाऱ्यांचा कामगारांवर वचक.अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे,तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर कामे करण्यात धन्यता मानली जात आहे.वर्षानुवर्ष हा प्रश्न सातत्याने सतवत आहे,पालिकेच्या माध्यमातून झालेले कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहेत याबाबत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील तसेच सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.कोपरगावला धुळीचे साम्राज्य हे कायमचे पाचवीला पुजलेले आहे.मात्र, आता या प्रश्नावरून गांधीनगर भागातील नागरिक महिला नगर पालिकेसमोर उपोषणास बसणार आहेत,त्याचप्रमाणे गुरु शुक्राचार्य यांचे जगातले एकमेव मंदिर बेट भागात आहे तेथे आता पर्यटनास चांगला भाग आहे,मात्र तेथील रस्ते गटारी,स्वच्छता यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तेथील नागरिकांनी तसेच ट्रस्टच्या वतीने अनेकदा निवेदनेही दिली मात्र, त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे,त्यामुळे स्वच्छता,चांगले पिण्याचे पाणी याकडे मात्र मोठ्या प्रमाणावर सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे हे कोपरगावकरांचे दुर्दैव आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्या अनेक ठिकाणी फुटलेल्या आहे त्यात गटाराचे पाणी राजरोजपणे मिसळत असतानाही हजारो रुपये खर्च दुरुस्तीकडे दाखवला जातो मात्र समस्या जैसे थे आहे.यास जबाबदार कोण ?असाही प्रश्न माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी उपस्थित केला आहे.