
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव- येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत आयोजित‘पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत’ वेगवेगळ्या फेऱ्या पार करीत अंतिम यश संपादन करून रुपये ६०००चे पारितोषिक पटकावले.
सदर स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर,पुणे येथील एस.एम.जोशी महाविद्यालयात संपन्न झाली.या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून दोनशेपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धे दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्न फेरी,ऑडिओ, व्हिडिओ ओळखणे,रॅपिड फायर राऊंड घेतले गेले.त्यातून सेमी फायनल राऊंडसाठी १५ संघ निवडले गेले व अंतिम फेरीसाठी ०५ संघ निवडले गेले होते.एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या कु.पूजा खटकाळे व कु.कल्याणी खटकाळे या विद्यार्थिनींनी अंतिम फेरीतील पाच संघात आपले स्थान निर्माण केले.आणि या अंतिम फेरीत सहा हजार रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
पदवी व पदव्युत्तर स्तरावरील स्पर्धकांच्या बरोबर स्पर्धा करत एफ.वाय. बी.ए.(प्रथम वर्ष कला)च्या वर्गातील या विद्यार्थिनींनी आपली चमकदार कामगिरी दाखविली.या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड.भगिरथ शिंदे,सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदर विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांची प्रेरणा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.उज्ज्वला भोर तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री.सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.