
कोपरगाव : – सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे नुकताच एकल महिलांचा तिळगुळ समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.या समारंभास जवळपास 100 ते 120 एकल भगिनींनी सहभाग नोंदवला. हळदी कुंकू हा समारंभ फक्त सवाष्ण महिलांचाच या विचाराला फाटा देत, अगदी नटून थटून एकल महिला या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या.

कोपरगावचे डॉ.आयुर्वेद तज्ञ कौस्तुभ भोईर यांनी महिलांनी आरोग्यपूर्ण जीवन कसे जगले पाहिजे,महिलांच्या दैनंदिन तक्रारीवर अगदी घरगुती सोपे उपाय,काही टिप्स अगदी हसत खेळत महिलांना दिल्या हे सांगताना कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्याजवळ नव्हता.महिलांनी वही पेन काढून ते लिहून घेतले.मुळात आजार होऊ नये म्हणूनच कोणते काळजी घ्यावी यावर अतिशय प्रभावीपणे महिलांशी संवाद साधला.

त्याचबरोबर निखिल इंडस्ट्रीजचे उद्योजक अमोल घोलप यांनी देखील महिलांना उद्योग व्यवसाय बाबत पुढे येण्याचे आव्हान केले.वर्षा झंवर यांनी महिलांशी उखाण्यांच्या स्वरूपात संवाद साधला.त्याचबरोबर उडान प्रकल्पाचे प्रवीण कदम यांनी बालविवाह संदर्भातील कायदा व त्यामागचे धोके बालविवाह झालेल्या मुलींचे पुनर्वसन यावर महिलांमध्ये जनजागृती केली.
संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येऊन स्वतःच्या सुखदुःखाच्या व ऊदर निर्वाहासाठी करत असलेल्या व्यवसायासह इतर अनेक विषयांवर मनमोकळेपणाने एकमेकांशी चर्चा केली. महिलांच्या अडचणी समस्या समजून घेतल्या जातात.कौटुंबिक समस्या शेतीच्या समस्या याबाबत योग्य ते मार्गदर्शन महिलांना केले जाते. एकल महिलांना हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान अंतर्गत साऊ एकल महिला समितीचे आय कार्डचे वाटप देखील केले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकल महिलांचे मोठे संघटन उभे राहणार आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्षा सुधाभाभी ठोळे अरिहंत महिला मंडळाच्या शोभा भाभी ठोळे,अजमेरे ताई, संगीता बज, विद्या भोईर, सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या गीताताई रासकर, सुनिता ससाणे, छाया गिरमे,उमाताई वहाडणे,रजनी हंडी आदी महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमात सर्व महिलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वाती घुगे यांनी मानले .