
कोपरगांव दि.३ एप्रिल :- प्रत्येकाने साधु-संतांचा आदर करावा. त्यांच्या आर्शिवादासाठी कितीही कष्ट पडले तरी ते सहन करावे. धार्मीक कार्याची तपाशिवाय सिध्दता होत नाही. ईश्वरीय सेवेत आढेवेढे घेवु नये, स्त्रीयांनी मनांत कधीही ईर्षा ठेवु नये असे प्रतिपादन साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी केले.

येथील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्या वतीने श्री शिवमहापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे चौथे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, हिंदु धर्मसंस्कार प्रत्येकांने विसरू नये, महिलांनी सण वार साजरे करतांना कंजूषी करू नये, पुर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजाकडे आधुनिक युगात डोळेझाक करू नये. घरच्या देव्हा-यातील दैनंदिन पुजेतुन सकारात्मक उर्जा निर्माण होते. दैनंदिन आयुष्यातील अडी-अडचणी, दोष बाधा दुर होण्यांत त्याची मदत होते. कोपरगांवकरांनी याची देही याची डोळा भगवान शिव-पार्वतींचा विवाह सोहळा अनुभवला. साध्वी अनुराधादिदी यांनी भगवान शंकराच्या विवाह वेळच्या स्थितीचे तंतोतंत वर्णन प्रतिकृती देखाव्यातुन मांडले, कथा श्रवणांसाठी महिलांची लक्षर्णीय गर्दी आहे. कथेचा आनंद घेण्यासाठी भाविक घरूनच डमरू, टिपऱ्या, चिपळ्या, टाळ, झांजऱ्या आदि वाद्ये घेवुन येतात. साध्वी अनुराधादिदी यांची स्पष्ट वाणी त्यावरील प्रभुत्व, बोलण्याची लकब, प्रसंगानुरूप दृष्टांत महिमा सांगण्याची पद्धत भाविकांना विशेष भावली. जोडीला तबला, हार्मोनियम आदि वाद्य वाजविण्यांत निपुण असलेला कलाकार वर्ग यामुळे कथेत रंगत येत आहे. अबाल वृध्दाबरोबरच कथा श्रवणासाठी युवकांचीही लक्षणीय उपस्थिती असते.

मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. शंकर पार्वती विवाहानिमीत्त उपस्थितांना मुंबादेवी साई सेवकांनी अक्षदांचे वाटप केले. वरूणराजाने हजेरी लावत पाउसरूपी अक्षदा टाकल्या. व-हाडी मंडळीत भुत-पिशाच्य यांचा समावेश होता तसा जीवंत देखावा यावेळी सादर करण्यांत आला. बच्चे कंपनीने त्यास मनमुरादपणे दाद दिली.