
कर्मवीर शंकरराव काळे करंजी विद्यालयाचा उपक्रम
कोपरगाव:- विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले आदिवास प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी धावपळ होत असते परंतु अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या संकल्पनेनुसार व कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसील कार्यालयामार्फत आवश्यक ते शैक्षणिक कागदपत्रे २४ तासात विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे याच उपक्रमांतर्गत करंजी शाळेने विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पूर्तता करत शाळेतच हे दाखले वाटप करण्याचा जो अभिनव उपक्रम राबवला तो अत्यंत उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर शंकरराव काळे विद्यालय करंजी येथे मंगळवार दि १४ ऑक्टोबर रोजी १४१ विद्यार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र व १४१ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयत्वाचे दाखले नायब तहसीलदार सातपुते यांच्या शुभहस्ते तसेच राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव व दैनिक लोकमंथनचे प्रतिनिधी प्रा.विजय कापसे, सरपंच रवींद्र आगवन, स्कूल कमिटीचे डॉ. सुनील देसाई, सांडूभाई पठाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कापसे, आप्पासाहेब भिंगारे, एकनाथ कापसे, पोलीस पाटील अनिल चरमळ, कामगार तलाठी कृष्णा आरशेवार, शाळेचे मुख्याध्यापक दिनकर माळी, प्रदीप भाकरे आदी सह पालकांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नुकताच राज्य शासनाचा आदर्श कला शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे कलाशिक्षक संदीप चव्हाण व संत गाडगेबाबा विद्यापीठातर्फे अर्थशास्त्र विभागात पीएचडी मिळाल्याबद्दल करंजी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डॉ. ज्ञानोबा चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व शालेय शिक्षकांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षक राधाकिसन टाकसाळ, सूत्रसंचालन सचिन डांगे यांनी तर उपस्थितांचे आभार धनराज ठाकरे यांनी मांडले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.