
कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास उस वाहतुक करणारे ट्रकचालक, मालक, जुगाड वाहतुकदार, ट्रॅक्टरचालक, बैलगाडी वाहकांनी सुरक्षीतपणे वाहने चालवावी असे आवाहन सुरक्षा सप्ताहात करण्यांत आले.
श्रीरामपुर मोटार वाहन निरीक्षक श्री. गोसावी, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सोनवणे ताई यांच्या उपस्थितीत सुरक्षा सप्ताह घेण्यांत आला त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. रात्रीच्या वेळी वाहन चालतांना चालकांनी काय काळजी घ्यावी, क्षमतेपेक्षा जादा उसाची वाहतुक करू नये, ट्रॅक्टरचालकांनी टेपरेकॉर्डरवर मोठ्यांने गाणी वाजवु नये, रस्त्यात उस वाहतुकीचे वाहन नादुरूस्त झाले तर अन्य वाहनांना त्याची योग्य समज मिळावी यासाठी रेडीयम फलक लावावे, वाहनावरील लाल दिव्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, आदी उपाययोजनांची माहिती देवुन सुरक्षा सप्ताह बरोबरच कारखान्याचा हंगाम संपेपर्यंत सर्व उस वाहतुक वाहनधारकांनी सुरक्षीत उस वाहतुक करण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या.
प्रारंभी मुख्य शेतकी अधिकारी श्री. नारायण चौधरी प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व सर्व संचालक मंडळाच्या माध्यमांतुन उसतोडणी वाहतुकदार ट्रक ट्रॅक्टर चालक मालक, वाहतुकदारांच्या अडी अडचणी समजुन घेवुन त्यावर उपाययोजना केल्या जातात. शेतक-यांच्या शेतातुन ते थेट कारखाना कार्यस्थळावर सुरक्षीत उस वाहतुक होते. श्रीरामपुर परिवहन विभागाचे अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या सुचनांचे पालन केले जाते. यावेळी उस वाहतुक करणा-या वाहनांना सुरक्षेच्यादृष्टीने रेडीयम पटटे फलक वाटप करण्यांत आले.
याप्रसंगी सर्वश्री. बापूसाहेब औताडे, केशव होन, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, दिपक जगताप व त्यांचे सर्व सहकारी, उपखातेप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.