
कोपरगाव :आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथील नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतणाऱ्या संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरवासी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कोपरगाव शहरात 18 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास 3600 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
आत्मा मालिक ध्यानपीठ हे ‘प्रत्येक मानवाच्या हृदयात परमेश्वर (आत्मा) निवास करतो’ या वैश्विक तत्त्वावर कार्यरत असून ध्यान या आत्मिक साधनेच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मचिंतनाचा संदेश पोहोचवत आहे. परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संतासमवेत हा आध्यात्मिक प्रसार सुरू आहे.
नर्मदा दिंडी सोहळ्याची सुरुवात कोपरगावातील साईबाबा कॉर्नर येथून होणार असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमापर्यंत हा सोहळा पार पडणार आहे. दिंडीमध्ये आत्मस्वरूपाचा रथ अग्रभागी असून मंगल वाद्यांच्या गजरात व वाहन दिंडीच्या स्वरूपात हा सोहळा साजरा होणार आहे.
राज्यभरातील मोठ्या संख्येने भाविक या दिंडीमध्ये सहभागी होणार असून, आश्रमात आगमनानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटे माता नर्मदा जलपूजन, कन्या पूजन, नवनाथ पूजन व गुढी पूजनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या दोन्ही दिवसांत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी कोपरगाव शहरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिक व भाविकांनी या दिंडी सोहळ्यात व गुढीपाडवा विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन परमपूजनीय आत्मा मालिक माऊली यांचे दर्शनासह संत सानिध्यात सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेष्ठ संत परमानंद महाराज यांनी केले आहे.
या प्रसंगी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थीही या आयोजनात सहभागी होऊन सोहळ्याची सेवा करत शोभा वाढविणार असल्याचे तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यानी सांगितले आहे.