
कोपरगांव : – येथील संजीवनी युनिव्हरसिटीचा विद्यार्थी श्रीराज वैभव गिरमे याची आय आय टी कानपुर येथे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाच्या अडीच महिने प्रशिक्षणासाठी निवड झाली त्याबददल त्याचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला. या प्रशिक्षणासाठी संपुर्ण देशभरातुन २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन महाराष्ट्र राज्यातील तीनच विद्यार्थ्यांचा समावेश असुन त्यात कोपरगांवच्या श्रीराज गिरमे याने स्वतःबरोबरच संजीवनी युनिव्हरसिटीचा नांवलौकीक मिळविला आहे.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. ग्रामिण भागात राहुन श्रीराज गिरमे याने आय आय टी कानपुर येथे सायबर सिक्युरिटी अभ्यासाच्या प्रशिक्षणाची खडतर परिक्षा उत्तीर्ण केली त्याबददल त्याचे व आई वडीलांचे तसेच गुरूजनांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडेच आहे. आज जगात सायबर सुरक्षेला विशेष महत्व आले आहे. चि. श्रीराज याचे के. जी पासुन ते बी. टेक. आय टी सायबर सिक्युरिटीपर्यंतचे शिक्षण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुट मध्येच झाले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ४४ वर्षापुर्वी जे स्वप्न पाहिले त्यासाठीच्या सर्व पायाभुत सुविधा संजीवनीत उपलब्ध करून दिल्या त्याचे श्रीराजने चीज केले आहे. भविष्यात तो याही पेक्षा गुणवत्ता प्रधान होईल यात शंका नाही. विद्यार्थ्यांनी शिकुन मोठे व्हावे व सर्वांचे नांव उज्वल करावे असेही शेवटी ते म्हणाले. प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, विलासराव माळी, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, आदि विविध क्षेत्रातील मान्यवर संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी संचालक निवृत्ती बनकर यांनी आभार मानले.