
कोपरगाव:- कोपरगाव शहर आणि परिसरात महावितरण कंपनीने चालवलेला मनमानी कारभार, ग्राहकांची केली जाणारी आर्थिक लूट आणि वाढती दादागिरी यांमुळे नागरिकांमधील संतापाचा उद्रेक झाला आहे. शासकीय आदेशांना केराची टोपली दाखवणारी महावितरणची ही हुकूमशाही आता खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेने दिला आहे. महावितरणच्या या जुलमी कारभाराला चोख उत्तर देण्यासाठी येत्या २४ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता कोपरगाव महावितरण कार्यालयावर तीव्र संताप मोर्चा काढण्यात येणार असून कार्यालयाला घेराव घातला जाईल, अशी घोषणा नागरिकांनी केली आहे.
महावितरणच्या ‘या’ मनमानी व जुलमी कारभारावर जनतेचा तीव्र आक्षेप: जनतेच्या प्रचंड विरोधामुळे राज्य सरकारने स्मार्ट मीटर योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. असे असतानाही कोपरगावमधील महावितरणचे मुजोर अधिकारी शासकीय आदेश धुडकावून लावत आहेत. ग्राहकांवर छुप्या पद्धतीने स्मार्ट मीटर लादण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा संतापजनक प्रकार महावितरणने तात्काळ थांबवावा.
“४८ तासांत बिल भरा अन्यथा वीज कापू”, “स्मार्ट मीटर बसवा” अशा धमक्या देऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मीटर डिजिटल आहे असे सांगून, रिचार्ज संपताच कोणतीही पूर्वकल्पना न देता आपोआप वीज पुरवठा खंडित (ऑटोमॅटिक वीज कपात) करण्याची महावितरणची ही लूटमार आणि जुलमी पद्धत तातडीने बंद झालीच पाहिजे.
कोपरगाव शहरातील ‘विविध नगर डी.पी.’, आढाव डी.पी.’, ‘म्हसोबा डी.पी.’, ‘कुरेशी डी.पी.’, ओमनगर डी.पी.’, दत्तनगर डी.पी.’, ब्रिजलाल नगर डी.पी.’, गोरोबा नगर डी.पी.’, ‘लक्ष्मी नगर डी.पी.’ आणि ‘ग्रामीण रुग्णालय डी.पी.’ हे ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) अत्यंत धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या डी.पी.च्या अवतीभवती झाडी-झुडपे वाढली असून कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे वारंवार वीज खंडित होऊन नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही ढिम्म प्रशासन ढिम्मच आहे; ही कामे ३ दिवसांत पूर्ण झालीच पाहिजेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत महावितरणकडून जुने बंद मीटर आणि अतिरिक्त लोडच्या नावाखाली ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव बिले व दंड थोपले जात आहेत. या बिलांची पूर्ण पडताळणी होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाची वीज कापण्याची हिंमत महावितरणने करू नये. पावसाळा तोंडावर आला असतानाही झाडांच्या फांद्या छाटणे, घरांवरील लोंबकळणाऱ्या जीवघेण्या वीज तारा हटवणे किंवा डी.पी. वरील भार कमी करणे यांपैकी एकही काम महावितरणने केलेले नाही. महावितरण केवळ वसुलीत मग्न असून जनतेच्या जिवाशी खेळत आहे.
महावितरणच्या या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराविरुद्ध २४ जून रोजी होणाऱ्या आंदोलना दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी महावितरणचे प्रशासनच जबाबदार राहील, असा कडक इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व विनय भगत, विजय जाधव, मयूर आव्हाड आणि अमित आढाव यांच्यासह कोपरगावचे संतप्त नागरिक करत असून, निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता (संगमनेर), जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), पोलीस अधीक्षक (अहिल्यानगर) आणि पोलीस उपअधीक्षक (शिर्डी) यांना पाठवण्यात आल्या आहेत.