Homeकोपरगावशिक्षण ज्ञानातुन स्वतःच्या छंदाला महत्व देत मोठे व्हा - आमदार विवेक कोल्हे

शिक्षण ज्ञानातुन स्वतःच्या छंदाला महत्व देत मोठे व्हा – आमदार विवेक कोल्हे

कोपरगांव :- आपल्याकडील अचल संपत्तीपेक्षा शैक्षणिक विद्ववत्तेला जगात किंमत आहे, इयत्ता दहावी -बारावी हा विद्यार्थ्यांचा मुळ पाया असुन युवापिढींने शिक्षण ज्ञानातुन स्वतःचे छंद जोपासत मोठे व्हावे, आपले आई-वडील, गुरूजन यांच्याबरोबरच गांवाला, तालुक्याला, मातृभूमिला न विसरता समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान द्यावे असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. भ्रमणध्वनीचा अतिरेक टाळावा असेही ते म्हणाले.

संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयात सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरूवारी इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच पालक, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन मेळावा घेण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. दिपप्रज्वलन, सरस्वती व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यांत आले.

प्रारंभी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमितदादा कोल्हे यांनी प्रास्तविकांत संजीवनी एज्युकेशन सोसायटीची के.जी पासुन पी. जी. पर्यंतच्या शैक्षणिक उददीष्टांची व ध्येयाची माहिती देत गेल्या ४४ वर्षात ३२ हजार विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण पुर्ण केले, १ हजार ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी आज देश विदेशात मोठ मोठ्या संस्थेत उच्च पदावर काम करत असल्याचे सांगितले. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, हैद्राबाद आदि अग्रमानांकित शहरात मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण एकाच छताखाली मिळावे म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८२ साली या संस्थेचा पाया रचला. अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सुमितदादा कोल्हे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह सर्व ज्ञात अज्ञात घटकांनी याचा वेलु गगनावर नेण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत.

आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, या देशाचे जबाबदार नागरिक घडण्यासाठी विद्यार्थी युवकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच भावनिक प्रश्नांना जास्त महत्व न देता सभोवताली व बाहय जगात घडणा-या घटनांचे आकलन ठेवावे, आज प्रत्येक क्षेत्रात अनिश्चीतता वाढत आहे त्यासाठी आई वडीलांनी आपल्या पाल्याबरोबर सतत संवाद ठेवावा. कोपरगांवची ओळख आता शिक्षणाचे माहेरघर बनली आहे. भविष्यात काय व्हायचे याची जिदद बाळगा, त्यावर लक्ष केंद्रीत करा, त्यानुरूप अभ्यासकम निवडा, आवड ओळखा मग निवड करा, संजीवनी युनिव्हर्सिटीत जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत विकसीत व विकसनशील देशात घडणा-या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवुन उद्योग, व्यावसायिक, पंचतारांकित औद्योगिक वसाहती व अन्य व्यावसायिकांना कशाप्रकारचे मनुष्यबळ हवे त्यानुरूप अभ्यासक्रम तयार करून पायाभूत सोयींवर भर देण्यात अमितदादा कोल्हे कार्यरत आहेत. सध्याचे युग हे डिजीटल आणि संगणकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणांत विस्तारले जात आहे, आर्टीफिशियल इंटिलीजन्स, रोबोटिक, मशिन लर्निंग, एआयडीएस आदि शिक्षणाच्या ज्ञानकक्षा रूंदावत आहेत. जो वाचेल तोच टिकेल ही माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण प्रत्येकांने अंगीकारावी. जागतिक आव्हानांना सामोरे जातांना संयम ठेवा, ज्याच्यात सातत्य आहे तोच पुढे जातो, इतरांपेक्षा आपणही कशात कमी नाही ही भावना युवकांनी जागृत ठेवावी, जबाबदारीची जाणिव करून घ्या, शिक्षक चुकला तर पिढी चुकते, संस्कार विसरले तर युवक भरकटले जातात तेंव्हा प्रत्येक घटकाने आपापल्या जबाबदा-या नीट सांभाळत उच्च दर्जेदार अभियांत्राकी, तांत्रीक, व्यवस्थापकीय, वैद्यकिय, औषधनिर्माण, सैनिकी, शिक्षकी, सैन्यभरतीपुर्व, पदवी, पदव्युत्तर, औद्योगिक प्रशिक्षणासह मराठी -इंग्रजी बरोबरच जर्मन, जपानी, कोरियन, रशियन भाषेचे ज्ञान आत्मसात करून सर्वगुणसंपन्न व्हा हाच संदेश यानिमीत्ताने द्यावासा वाटतो.

याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, संजीवनी युनिव्हर्सिटीचे सर्व पदाधिकारी, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, के. बी. पी. पॉलेटेक्नीकचे प्राचार्य अभिजित मिरीकर, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विपुल पटेल, डॉ. विनोद मालकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, पालक, आई वडील, आजी आजोबा, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. आर. ए. कापगते यांनी आभार मानले. सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.

इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसला त्यामुळे कार्यक्रम स्थळी आसन व्यवस्था देखील कमी पडली.व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची नियोजन उत्तमपणे केले.

विद्यार्थ्यांना संजीवनी एज्युकेशन सोसायटीने विविध अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्याविषयीची प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!