Homeकोपरगावआविष्कारातून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर संशोधन करावे : प्राचार्य डॉ. पाचोरे

आविष्कारातून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर संशोधन करावे : प्राचार्य डॉ. पाचोरे


एस.एस.जी.एम.महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा; ७३ प्रकल्पांत ११७ विद्यार्थी सहभागी

कोपरगाव : “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी आपल्या परिसरातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपाय शोधणे ही विद्यार्थ्यांच्या संशोधनाची खरी दिशा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावापासून, तालुक्यापासून आणि परिसरातील समस्यांपासून संशोधनाची सुरुवात करून त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे प्रकल्प विकसित करावेत,” असे प्रतिपादन स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पाचोरे यांनी केले .ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

डॉ. पाचोरे म्हणाले की, आविष्कार स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी देते. केवळ इंटरनेटवरून माहिती संकलित करून प्रकल्प तयार करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर नवीन, व्यवहार्य आणि समाजोपयोगी उपाय शोधला पाहिजे. कृषी, पर्यावरण, प्लास्टिक कचरा, पाणीप्रश्न आणि टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन यांसारख्या ज्वलंत विषयांवर संशोधनासाठी मोठ्या संधी आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचे प्रकल्प पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात.

आविष्कार स्पर्धेचे परीक्षक प्रा. संजय सांगळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करताना, बक्षीस मिळणे हा स्पर्धेचा एक भाग असून त्यापेक्षा संशोधनात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रा. सीमा दाभाडे यांनी अंतिम निकालापेक्षा विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयासाठी घेतलेली मेहनत आणि विकसित केलेली संशोधनवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. केवळ समस्या मांडण्याऐवजी त्या समस्येवर प्रत्यक्ष कोणता उपाय करता येईल, याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “यावर्षी महाविद्यालयातील ७३ प्रकल्पांमध्ये ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेपुरते मर्यादित न राहता आपल्या कल्पनांचा पुढे विकास करावा. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चांगल्या प्रकल्पांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील. ज्ञान, कौशल्य आणि कलात्मकता यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आविष्कारातील कल्पनांना योग्य दिशा मिळाल्यास त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात,” असे प्रतिपादन केले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राजेश मंजुळ (सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय,संगमनेर), प्रा. सूर्यवंशी (संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय), तर अंतर्गत परीक्षक म्हणून डॉ. नामदेव आडमुठे, डॉ. विलास जीवतोडे आणि प्रा. काजल साळुंके यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे पाहुण्यांचे परिचय व प्रास्ताविक आविष्कार स्पर्धेचे प्रमुख डॉ. विलास गाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियंका पवार आणि प्रा.अक्षदा कदम यांनी केले, तर आभार प्रा. सचिन सोनवणे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!