
संपादक – राजेंद्र तासकर
निराधारांना अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.व्यक्तीला जर कोणत्या गोष्टीत समाधान असेल तर ते अन्नदानात आहे त्यामुळे समता चॅरिटेबल ट्रस्टचा हा उपक्रम समाजोपयोगी आहे.समाजात बोलणे खूप सोपे आहे,पण कर्तृत्व करणारे माणसे समाजात खूप कमी असतात.खरा परमात्मा मंदिरात नाही, तर तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. याची जाणीव आज समता परिवाराने करून दिली आहे.धन खूप असते पण त्या बरोबरच हृदय पण असावे लागते.जेव्हा सूर्य नाही होता येत तेव्हा दिवा होऊन कर्तृत्व सिद्ध करण्याची कुवत काका कोयटे यांच्याकडे आहे.जो पर्यंत कर्तृत्व महान नसेल,तो पर्यंत जीवन महान होऊ शकणार नाही.याची प्रचिती आज समता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मोफत घरपोहोच भोजन डबे वाटप योजनेच्या शुभारंभ करताना आली.असे मत कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठाचे ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज यांनी व्यक्त केले.
समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री.गुलाबचंद खेमचंद अग्रवाल यांच्या ७५ व्या आणि कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील अनाथ,गरजू आणि निराधारांना मोफत घरपोहच भोजन डबे वाटप योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध व्यापारी श्री.जेठाभाई पटेल,श्री भिमजी पटेल आणि श्री.नारायण अग्रवाल आणि त्यांच्या हस्ते उपस्थित २५ अनाथ,गरजू आणि निराधारांना जेवणाचे मोफत डबे वाटून करण्यात आला.त्या प्रसंगी श्री.गुलाबचंद अग्रवाल आणि सौ.सुहासिनी कोयटे यांना आशिर्वाद देताना ते बोलत होते.
मनोगत व्यक्त करताना सौ. सुहासिनी कोयटे म्हणाल्या की,समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला तो अविस्मरणीय आहे.तसेच अनाथ, निराधारांना घरपोहच मोफत डबे योजनेचा शुभारंभ आज जरी केला असला तरी,या अगोदर आपण उच्च प्रतिचा,पौष्टिक आहार आपण देत होतो.पण कोरोनामुळे आपल्याला मोफत घरपोहच डबे देण्याचे बंद करावे लागले,पण आज श्री.गुलाबचंद अग्रवाल आणि माझ्या वाढदिवसा निमित्ताने हे सामाजिक कार्य पुन्हा सुरू करून सामाजिक दायित्वाची खंडित झालेली परंपरा आज नव्याने सुरू करून निराधारांना पौष्टिक,उच्च प्रतिचा आहार देऊया.
प्रमुख पाहुणे श्री.जेठाभाई पटेल यांनी श्री.गुलाबचंद अग्रवाल यांचे अभिष्टचिंतन करून पेढा भरविला तर सौ.सुहासिनी कोयटे यांचेही अभिष्टचिंतन शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी अभिष्टचिंतन करून त्यांना पेढा भरविला.तसेच संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी आत्मा मालिक ज्ञानपीठाचे ज्येष्ठ संत श्री. विवेकानंद महाराज यांचा सत्कार करून यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.नारायण अग्रवाल,समता पतसंस्थेचे संचालक श्री.अरविंद पटेल,श्री.संदीप कोयटे,व्यापारी महासंघाचे सचिव श्री.प्रदीप साखरे लिंगायत महिला मंडळाच्या सौ.प्रीती साखरे,समता परिवाराचे श्री.महेश भावसार,श्री.अजय तांबे यांनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला समता पतसंस्थेचे संचालक श्री.जितूभाई शहा,श्री.चांगदेव शिरोडे श्री.गुलशन होडे,व्यापारी श्री.दीपक अग्रवाल,जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड,व्यापारी महासंघ,लिंगायत संघर्ष समिती,लिंगायत महिला मंडळाच्या पदाधिकारी,सदस्य,पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी, हितचिंतक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले.उपस्थितांचे आभार श्री.महेश भावसार यांनी मानले.