Homeकोपरगावकोपरगावात साहित्य चळवळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू -स्नेहलताताई कोल्हे

कोपरगावात साहित्य चळवळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू -स्नेहलताताई कोल्हे

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात लायब्ररी असणे गरजेचे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

      आपल्याला ज्ञानाचा खजिना हा पुस्तक वाचनातून मिळत असतो;परंतु सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस यंत्रवत होत चालला असून,वाचन संस्कृती कमी होत चालली आहे.‘वाचाल तर वाचाल,ज्ञान मिळवाल,तर यशस्वी व्हाल’हा विचार आजच्या काळात खूप महत्त्वाचा असून,वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या घरात इतर सुखसोयीबरोबरच लायब्ररी असणे गरजेचे आहे.तरुण पिढीला वाचनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.एकमेकांना पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वाढवली पाहिजे.बळ देण्याची गरज आहे,असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.कोपरगाव शहरात साहित्य चळवळ वाढविण्यासाठी,साहित्यविषयक विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
           कोपरगाव येथे नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी (२ एप्रिल) आयोजित केले होते.या कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलताताई कोल्हे बोलत होत्या.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रजनी लुंगसे (धुळे) यांनी या काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले,तर संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकांत वानखेडे (पुणे) यांच्या हस्ते झाले.कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी नाते शब्दांचे साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,उपाध्यक्ष बाळासाहेब देवकर,सचिव आकाश वाकचौरे,सौ. चंदन तरवडे,सहसचिव डॉ.जी.के.ढमाले,कार्याध्यक्ष पंडित निंबाळकर,दिनेश चव्हाण,शबाना तांबोळी,संयोजक विलास नवसागरे,नंदकिशोर लांडगे,कवयित्री श्रावणी शिंदे,राजश्री लोंढे, सुरेखा बिबवे,उज्ज्वला कोल्हे,रत्नप्रभा दवंगे,बाबासाहेब दाभाडे,नारायण सोनवणे आदींसह पुणे,नगर,नाशिक,शिर्डी, धुळे,लातूर,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,रायगड,सातारा, परभणी,भंडारा आदी राज्याच्या विविध भागातून आलेले कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
       स्नेहलताताई कोल्हे यांनी या कविसंमेलनास आलेल्या सर्व कवी व कवयित्री यांचे स्वागत करून कोपरगावात हे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या,धान्य पेरल्यानंतर ते उगवले आणि पीक हातात आले की,शेतकऱ्यांना मोठे समाधान मिळते.कवी मन आणि साहित्य हे जीवन जगण्याची ऊर्जा देत असते.कवी आपले स्वत:चेच मन ताजेतवाने ठेवत नसतात तर इतरांचेही मन ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न ते करत असतात. आपण सर्व कवीजन भाग्यवान आहात.कारण,परमेश्वराच्या कृपेने आपल्याला वैचारिक समृद्धी मिळाली आहे.सगळ्यांनाच अशी वैचारिक समृद्धी मिळत नसते.देवाने आपल्याला कवी मन,शब्द सामर्थ्य,वैचारिक श्रीमंती दिली.प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सामर्थ्यवान आहेत;पण कवी,लेखक ही साहित्य क्षेत्रातील मंडळी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि समृद्ध आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे.कोपरगाव शहरात साहित्याची चळवळ अशीच सुरू रहावी,वृद्धिंगत होत राहावी,यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही कोल्हे यांनी दिली.

कवी आपल्या कवितेतून आपले मन मोकळे करत असतात. आपल्या भावना प्रकट करत असतात.समाजातील विविध विषयांवर भाष्य करून समाजप्रबोधन करण्याचे महत्त्वाचे काम कवी करतो.कवींचे कवी मन, शब्द सामर्थ्य,वैचारिक समृद्धी कळण्यासाठी समोरच्या माणसाची मानसिकता, वैचारिक ताकद व वैचारिक उंची तेवढी असावी लागते. दुर्दैवाने सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात माणसंही यंत्रवत होत चालली आहेत.मानवी संवेदना व भावनादेखील बोथट होत चालल्या आहेत.प्रत्येकजण यंत्राप्रमाणे जगत आहे.माणसा-माणसातील नाती बोथट होत चालली आहेत,वैचारिक कोरडे पणा येत चालला आहे.अशा परिस्थितीत सर्व कवी मंडळी सुकलेल्या मनांना फुलवण्याचे,शब्दांचे नाते जोडत आहेत, साहित्याची सेवा करत आहेत.म्हणून कवी,लेखक मंडळींचे समाजासाठी आणि साहित्य क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे व समाजाला दिशा दाखविण्याचे व समाज सुधारण्याचे मोठे काम साहित्यिकांच्या हातून होत असून ते निश्चितच कौतुकास्पद आहे,असे कोल्हे यांनी सांगितले.
आजकाल सामाजिक तेढ वाढत आहे.माणूस मानवता धर्म विसरत चालला आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होत असून,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन समाज व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत.दुर्दैवाने समाजासाठी घातक असलेल्या अशा लोकांच्या बेताल बोलण्याला प्रसार माध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत आहे,त्याचे बोलणे समाजासाठी फायदेशीर आहे का,याचाही विचार केला जात नाही.दुसरीकडे चांगले काम करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि नको त्या गोष्टीची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे,ही दुर्दैवाची बाब आहे.समाजात जे काही चांगले आहे,त्याचा अंगीकार करा.वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नका. सकारात्मक वृत्तीने जगा,असे आवाहन कोल्हे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रजनी लुंगसे म्हणाल्या,कोपरगाव शहरात साहित्य क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम घेण्यासाठी नगर परिषदेच्यामाध्यमातून साहित्यिकांसाठी एक सभागृहउपलब्ध करून द्यावे.दरवर्षी आम्ही तेथे विविध कार्यक्रम घेऊ.कोपरगाव हे पुस्तकांचे, वाचकांचे,रसिक मनाचे आणि विचारांचेआदानप्रदान करणारे केंद्र होईल आणि यामध्ये स्नेहलताताई कोल्हे ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या दोघींचे नाव सर्वात पुढे असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!