उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असुन त्यात पाण्याची समृध्दी झाल्याशिवाय त्याचे वाटप होवुच शकत नाही,वाढत्या नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे तुटीच्याच पाण्याचे वाटप होत आहे हे बरोबर नाही अशी भूमिका स्वतःच्या शासनाविरूध्द मांडून त्यासाठी रस्त्यावर येवुन भांडणारे,अहमदनगर नाशिकसह मराठवाडयाच्या पाण्यासाठी वयाची ९३ वर्षे पूर्ण झाली तरी संघर्ष करणारे जलभगिरथ शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेती सिंचन पाणी प्रश्नाचा आत्मा हरपला अशा शब्दात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी श्रध्दांजली वाहिली.
खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी कोल्हे कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,टीका करणे,प्रश्न मांडणे सोपे आहे,पण उपायोजना देणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात त्यात शंकरराव कोल्हे यांचे नाव अग्रभागी होते.पाणी प्रश्नाचा गाढा अभ्यास असलेले शंकरराव कोल्हे आम्हा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना एक करायचे आणि वेगवेगळी भूमिका घेवुन भांडण्यापेक्षा नगर नाशिकसह मराठवाडयाचा दबावगट शासनावर निर्माण करा त्याशिवाय शेती सुजलाम सुफलाम होवु शकत नाही असे सांगत.
मराठवाडयाच्या पाण्याची तुट भरून काढायची असेल तर समुद्राला पश्चिमेचे पाणी वाहुन जाते ते पुर्वेकडे वळवावे म्हणून तत्कालीन जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष माधवराव चितळे यांच्यापुढे शंकरराव कोल्हे यांच्यासह नाशिक भागातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी २३ वर्षापुर्वी उपाययोजना सुचविल्या होत्या.पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी होत असतांना अवर्षणग्रस्त भागाला पाणी मिळाले पाहिजे ही शंकरराव कोल्हे यांची मागणी रास्त होती,त्याच्या सोडवणुकीसाठी त्यांनी आयूष्यभर रस्त्यावर येत संघर्ष केला असे असे नेतृत्व यामागेही झाले नाही व पुढे होणार नाही असेही ते म्हणाले.