
संपादक – राजेंद्र तासकर
नॅशनल फेडरेशन को. ऑप.शुगर महासंघ नविदिल्लीचे माजी उपाध्यक्ष आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने साखर उद्योगाची ज्ञान संपत्ती हरपली त्यांच्या जाण्याने राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व व्यक्तीगत आपले मोठे नुकसान झाले अशा शब्दात कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी शोक व्यक्त केला.
संजीवनी उद्योग समुह आणि कोल्हे कुटूंबियांना पाठविलेल्या शोकसंदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे की,शंकरराव कोल्हे आणि साखर उद्योग हे एक घटट नातं होतं.देश विदेशात साखर उद्योगात होणा-या स्थित्यंतराविषयी जबाबदारीने माहिती घेवुन त्यानुरूप केंद्र व राज्य शासन,राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ,महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ,वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट,शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, पाडेगांव उस संशोधन केंद्र, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन व सर्व कृषि विद्यापीठे,देशातील अन्य ठिकाणच्या उस संशोधन संस्था आदि सर्व ठिकाणी ध्येय धोरणं ठरविणे,साखर उद्योगावर आलेल्या संकटाच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचविण्याचे मुख्य काम शंकरराव कोल्हे यांनी संपूर्ण आयुष्यभर केले.या उद्योगात तयार होणा-या उत्पादनांची एमआरपी कशी काढायची एव्हढा बारकाईचा अभ्यास त्यांचा होता.विदेशातील तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वदेशी तंत्रज्ञान येथेच कसे विकसीत होईल यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष होता. दुष्काळ,नापिकी,पर्जन्यमान, अतिवृष्टी,कमीत कमी पाण्याचा ठिबक सिंचनाने वापर यातील सर्व संक्रमण अवस्थेत साखर उद्योग आणि त्यावर अवलंबुन असणारे घटक जगविण्याचे मोठे काम त्यांनी केले त्यामुळे त्यांच्या जाण्याने आपल्या साखर ज्ञानातील एक तारा निखळून पडला आहे.साखर गाळपाबरोबरच रासायनीक उपपदार्थांची निर्मीती,सहवीज निर्मीती,आसवनीतुन निघणा-या सांडपाण्यावर बायोगॅस,इथेनॉल, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल, बीट पासून साखर,बॉयलर क्षमता वाढ,औषधी उत्पादने यासह असंख्य प्रयोग त्यांनी यशस्वी करत त्यापासून इतरांना प्रेरणा दिली,टिकेतुन ते स्वतः शिकत गेले.शेतक-यांच्या हालअपेष्टा बांधावर जात समजून घेवुन आम्हा कार्पोरेट अधिका-यांना त्याची सतत जाण करून त्यासाठीची कल्पक धेय धोरणे घ्यायला लावणारे व्यक्तीमत्व हुरहुर लावून गेलं. कुठल्याही संकटावर तोडगा काढण्याचे बुध्दी चार्तुय त्यांच्याकडे होते,त्यांचे निधन साखर उद्योगातील बदलांना पोरकेपणाचे आहे अशा व्यक्तीमत्वाचा माणूस पुन्हा होणे नाही असे ते शेवटी म्हणाले.