
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – प्रभू रामचंद्रजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये व उत्तर -दक्षिण काशी गंगा संबोधलेल्या गोदावरी मातेच्या कुशीत व भगवान राघवेश्वराच्या आशिर्वादाने व सानिध्यात श्री.संतोषजी हरीभाऊ मोहरे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने सुसज्ज अशी (नौका) बोटींग्जचा लोकार्पण सोहळा सोमवार दि.७ ऑक्टोंबर २०२४ रोजी मठाधिपती प.पू.श्री.श्री. १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व मान.आमदार श्री.आशुतोषदादा काळे साहेब यांच्या शुभहस्ते मोठया उत्साहात संपन्न झाला.

मा.श्री.आमदार आशुतोषदादा काळे यांनी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व कार्यकर्त्याच्या समवेत

गोदावरी नदीमध्ये बोटीत बसून प्रेक्षणीय स्थळाची पाहणी करत त्या ठिकाणी असलेल्या समस्यांचा कार्यकर्त्यां बरोबर चर्चा करत वेध घेतला त्याचबरोबर पर्यटनाचा आनंदही लुटला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कर्मवीर शंकरावजी काळे सहकारी साखर कारखाना व विविध संस्थांचे आजी – माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आमदार श्री.आशुतोषदादा काळे हे होते.अध्यक्षस्थानावरून बोलतांना ते म्हणाले कि,देवस्थान विकास निधी अंतर्गत राघवेश्वर देवस्थानसाठी कुंभारी गोदावरी नदी पुलापासून ते राघवेश्वर देवस्थानपर्यंत संरक्षण भित बांधण्यासाठी प्रस्ताव पाठविलेला असून शासनस्तरावर त्यास मंजुरी मिळणे बाकी असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आपल्या भाषणात सांगितले, त्याचबरोबर त्यांनी या अगोदर देवस्थानला भरीव निधी दिल्याबद्दल देवस्थानचे मठाधिपती महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व श्री.संतोषजी मोहरे कुटुंब आणि श्री. सतीषजी कदम यांच्या वतीने मा. आमदार श्री.आशुतोषदादा काळे यांचा

शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, पूर्वी कुंभारी येथे गोदावरी नदीवर पूल नसल्यामुळे पश्चिमेकडील जनतेला व शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्वेकडे तालुक्याच्या ठिकाणी जाणे – येण्यासाठी नौकेने (होडीने) पाण्यातून प्रवास केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी माजी.खासदार शंकररावजी काळे साहेब यांनी दुरदृष्टी ठेवून जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भूमीपूजन करूनही त्यांची इच्छा आधूरी राहुन गेली परंतु, माजी.आमदार मा.श्री.अशोकदादा काळे यांनी वडिलांची इच्छा पूर्तीसाठी २००४ साली शासनस्तरावर प्रयत्न करून पुलाची मंजूरी मिळवून घेतली. परंतु, माजी.आमदार मा.श्री.अशोकदादा काळे आमदार असतांना त्यांच्या कार्यकाळात पूल होऊ नये यासाठी विरोधकांनी शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून बंधाऱ्याचे पाणी सोडण्यास विरोध करत जल आंदोलन उभे केले व बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास मज्जाव केला परंतु,माजी. आमदार श्री.अशोकदादा काळे यांनी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता कारखान्याच्या माध्यमातून हिंगणी येथील बंधाऱ्यावर जनरेटरची व्यवस्था करून मोठमोठया विद्युत मोटारी बसवून सातच दिवसात पाणी उपसा करून पूलाच्या फाउंडेशनचे काम चालू करून पूल पूर्णत्वास नेला व कुंभारी येथे गोदावरी नदीवरील वडिलांची पूलाची इच्छा पूर्णत्वास नेली. त्याचबरोबर कुंभारीसह इतर ठिकाणीही पूल बांधल्यामुळे जनतेची गैरसोय दूर झाली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.कुंभारी येथे पूल बांधल्यामुळे बोटीची गरज संपली आहे. पण आज पर्यटनासाठी श्री. राघवेश्वराच्या ह्या पूण्यभूमीमध्ये श्री.संतोषजी मोहरे यांनी सुरू केलेली बोट ही कोपरगाव मतदारसंघात पर्यटन क्षेत्रात होत असलेल्या विकासाचा नवा अध्याय असेल असेही गौरौद्गार मा.आ.आशुतोषदादा काळे यांनी शेवटी काढले.

यावेळी मठाधिपती प.पू.श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले कि,

मोहरे कुटुंब हे धार्मिक असल्याने राघवेश्वर भगवान त्यांची मनोकामना पूर्ण करीत आहे. पुढे ते म्हणाले की, संतोषजी मोहरे यांचे वडील हरीभाऊ नारायण मोहरे हे दररोज न चुकता पहाटे ३ वाजता मंदिरात येऊन राघवेश्वरासह सर्व देवीदेवतांना गोदावरीच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक घालून बेल व फुलांची आरास घालून त्यांना सजवतात. ”भगवंतासाठी तुम्ही कणभर द्या,भगवंत तुम्हाला मनंभर देईल” या उक्तीप्रमाणे राघवेश्वराने त्यांची इच्छा या नौकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली.त्यांची ही (जलपरी) नौका राघवेश्वराच्या कृपा आशिर्वाने पर्यटकांसाठी अखंड सुज्ज राहो व पर्यटकांना त्याचा आनंद मिळो हिच मोहरे कुटुंबास भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर अनेकांनी या कुटुंबाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेशजी साळुंके यांनी केले तर उपस्थितांचे आभार सतिषजी कदम यांनी शेवटी मानले.