Homeकोपरगावकाल्यासाठी साधना महत्वाची अन्यथा कालवा-कालव --मुक्ताई ज्ञानपीठ चे महंत रामानंदगिरी शास्त्री

काल्यासाठी साधना महत्वाची अन्यथा कालवा-कालव –मुक्ताई ज्ञानपीठ चे महंत रामानंदगिरी शास्त्री

श्रीराम जय राम जय जय राम या तेरा अक्षरी मंत्रघोषाची दीक्षा रामदासी बाबांनी भाविकांना दिली त्याचे स्मरण म्हणून गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक किरण रंगनाथ डहाळे नेवासा यांनी समाधी मंदिरास रामनामाचा यंत्रचलित बोर्ड आणि तीन खणीस फॅन दान दिला, मसालेभात, घुगरी, बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव – गोपाल काल्यासाठी साधना महत्वाची असते,तेथेच काला होतो अन्यथा जीवनात कालवा- कालव होते,जीवनात पैसा हे सर्वस्व नाही, परमार्थ,नामस्मरण करा, घेण्यापेक्षा द्यायला शिका असे प्रतिपादन मुक्ताई ज्ञानपीठ (पुणतांबा) चे महंत रामानंदगिरी शास्त्री यांनी केले.ज्ञानी, उपासक, सत्ता- संपत्तीवाल्यांना काला करता येत नाही तर त्यासाठी भावीक व्हावे लागते असेही ते म्हणाले.ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुकाराम गाथा, किर्तन महोत्सवाची सांगता 23 जानेवारी रोजी काल्याच्या किर्तनाने झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.

महंत रा‌मानंद‌गिरी शास्त्री पुढे म्हणाले की,जीव शिवात पूर्ण होतो तेथेच जीवनाची समाप्ती होते.भगवंताच्या काला प्रसादासाठी साक्षात स्वर्गलोक इंद्रलोक आले पण त्यांना त्याची प्राप्ती झाली नाही.किर्तन सप्ताहानंतरच काला होतो, सगळ्यांना एकत्र करण्याचे काम परमार्थ करतो.

ब्रह्मलीन संत रामदासी महाराज यांनी साधना संस्कारातून कोकमठाणस‌ह देश -विदेशात शिकवण दिली. त्यांच्यामुळेच मला आज तुमच्यापुढे कीर्तन करता आले, आजाराची व्याधी मागे लागली पण देवाच्या नामस्मरणातून मला ऊर्जा मिळाली त्यातूनच परमार्थाबद्दल थोडेफार सांगता आले. ज्याला मिळवता येतं त्यालाच वाटावसं वाटत,प्रत्येक भक्ताच्या जीवनांत भक्ती हे सौभाग्याचं लेणं आहे.संत सदैव त्याग करतात त्यातून दुसऱ्यांना परमानंद देतात. जग मायेनं मोहित झालेलं आहे. संपत्ती नसली तरी संस्कृती मौल्यवान आहे, ती कोकमठाणमध्ये आहे. रामदासी बाबांनी लहान मुलांना गीता, श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र, स्वाध्याय शिकवला. काम संपलं की, मनुष्य रिकामा होतो आणि संसारात रिकामटेकडा होतो असेही ते शेवटी म्हणाले.

बुधवारी सायंकाळी कोकमठाण पंचक्रोशीतून रामदासी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, सुवासिनींनी रस्त्यावर सडा रांगोळी काढून फुलांची सजावट केली, ठीक ठिकाणी अयोध्या राम मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रीरामाच्या तस्वीर पूजनात आल्या.

समर्थ भक्त प्रसाद बुवा रामदासी, मुकुंद शुक्लेश्वर बिडवे,सौ सुनीता बिडवे या उभयतांच्या हस्ते रामदासी बाबांच्या समाधीस्थानावर महामस्तकाभषेक रुद्राभिषेक करण्यात आला,पौरोहित्य पद्माकर पदे, सोमनाथ जोशी, सुभाष जोशी गुरुजी आदींनी केले. संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कोपरगाव तालुका महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे यांनी कीर्तन सप्ताहास भेट दिली.

याप्रसंगी सूर्यानंदगिरी महाराज,व्यासपीठ चालक तुकाराम महाराज वेळजाळे, मोहनिराज महाराज लोंढे, रामदास महाराज वाघ, सोपान काका बाराहाते, अरुण भैय्या पगारे, अरुण महाराज रोहम, मृदुंगाचार्य धीरज महाराज कुऱ्हे, निळोबा महाराज, रंगनाथ किसन डहाळे सर आदींचा सत्कार करण्यात आला. खंडाळा येथील विकास भावसार यांनी किर्तन सप्ताहासाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिकृती बहारदार मंडप सजावट केली होती. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रामदासीबाबा भक्त मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी कीर्तन सप्ताह यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!