
कोपरगाव : -संपूर्ण विश्वाला संविधानाच्या चौकटीत राहुन जगण्याची दिशा देणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे जेष्ठ नागरिक मा. श्री. वामनराव ठाणगे यांच्या हस्ते पूष्पहार अर्पण करून व फटाक्यांची अतिषबाजी करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत असलेला शालेय विद्यार्थी नमन राजेंद्र कदम याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा विस्तृतपणे सर्वासमोर मांडली. त्याचबरोबर माजी.

मुख्याध्यापक मा. श्री. अशोकराव वारुळे सर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, साधारण १३४ वर्षापूर्वी आपल्या भारत भूमीला एक स्वप्न पडलं आणि १४ एप्रिल १८९१ ला रामजी बाबांच्या कुळात या नवरत्नाचा महु या गावी जन्म झाला. अन्यायाविरुद्ध लढण्याचे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचे काम त्यांच्या आई – वडिलांनी बाल वयातच केले. दीन -दलित समाजावर होणारे अन्याय जर दुर करायचे असेल तर शिक्षण हेच वाघीणीचे दुध आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. समाजामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला गदारोळ, दरी भरून काढण्याचा विडाच उचलला आणि तो पूर्णत्वास नेला. आपल्याला स्वतःच्या कुटुंबातील दहा व्यक्तीच्या विचारांची सुसंगती साधणे अवघड जाते. मात्र, आठरापगड जातीच्या लोकांच्या विचारांती संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणूनच त्यांना अवघ्या जगाने महामानव म्हणून उदबोधित केले. अशा या “महामानवास” त्रिवार अभिवादन करतं मनोगतास पूर्णविराम दिला. त्याचबरोबर माजी. सरपंच दिगंबर बढे,अतुल निळकंठ सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बालगोपाळ, माता -भगिनी, ग्रामस्थ व भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान खळे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार विकास खळे यांनी मानले.
