
कोपरगाव : – साहित्य हा समाजाचा आरसा असून साहित्यिकांनी आपल्या लेखणीचा उद्देश फक्त सौंदर्य निर्मिती नाही, तर समाज परिवर्तनकारक असावे.आजही आपण पाहतो की जात, धर्म, आर्थिक विषमता, बेरोजगारी या समस्या आपल्या आजूबाजूला आहेत. मग साहित्यिकांचे कर्तव्य काय? या प्रश्नाचे उत्तर अण्णाभाऊंच्या जीवनात सापडते. त्यांनी म्हटलं होतं “जग बदलण्यासाठी लिहा, अन्यायाविरुद्ध लिहा.”आपल्या कथा, कविता, कादंबऱ्या या केवळ छंद म्हणून न राहता सामाजिक जागृतीचे साधन व्हाव्यात, अशी अपेक्षा अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून बोलतांना साहित्यिक राजेंद्र फंड यांनी काढले.
श्रीरामपूर येथे 31 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने संयोजक बाबासाहेब पवार यांचे नियोजनाखाली हे एकदिवसीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये हे होते तर स्वागताध्यक्ष श्री. काळुराम बोरुडे हे होते. प्रमुख मान्यवरांमध्ये वर्ल्ड सामनाचे संपादक श्री. प्रकाश कुलथे, सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष त्रिभुवन, श्री. चरण त्रिभुवन, श्री. विजय शेलार, साहित्यिक सायमन भारस्कर, पोपटराव पटारे, श्री. रुपचंद शिदोरे व सुरेश वैरागर आकाशवाणीचे वृत्तनिवेदक श्रीम.गायत्री म्हस्के, श्री. संतोष मते व श्री. जगदीश भगत हे होते.
आपल्या भाषणात ते आणखी म्हणाले की, समाजाला आवश्यक असणारे समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, मानसिक आरोग्य, आणि बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर नवसाहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनाने आम्हाला शिकवले की “साहित्य म्हणजे जगण्याची शिदोरी आहे.” या शिदोरीने आपण समाजात आशा, समानता, आणि मानवता निर्माण करूया.
प्रास्ताविकात प्रमुख संयोजक लोककवी बाबासाहेब पवार यांनी वर्षभरात चालणारे संस्थेचे विविध उपक्रम, वेगवेगळे साहित्यिक संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती दिली.
स्वागताध्यक्ष श्री. काळुराम बोरुडे यांनी सर्व मान्यवर, साहित्यिक व साहित्य रसिक यांचे स्वागत केले. आयोजक श्री. बाबासाहेब पवार व साथीदारांनी हे संमेलन उत्कृष्टरित्या घडवून आणल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. उद्घाटक साहित्यिक बाबुराव उपाध्ये म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने वर्षभर साहित्यिक कार्यक्रम केले जातात. यातून अनेक साहित्यिक घडले आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक, कवी यांनी या संमेलनास हजेरी लावली आहे.समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साहित्यिक, कलावंत यांचा गौरव ही संस्था करते आहे. यासाठी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.
परिसंवाद प्राध्यापक डॉ.संजय दवंगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यात वर्धा येथून आलेले साहित्यिक जगदीश भगत यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र उत्कृष्टरीत्या उलगडून दाखविले तर कथाकथनामध्ये साहित्यिक सुरेश भिंगारदिवे यांनी कथेची सुंदर गुंफण सादर केली. कवी रुपचंद शिदोरे व कवी संजय वैरागर यांनी कविसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी यांचा गौरव करण्यात आला.
या संमेलनासाठी श्री भाऊसाहेब भोंडगे, कवी राजू थोरात, कवियत्री सुहानी पवार, आशिष पवार, प्रियंका पवार, ओम अभंग,तुषार त्रिभुवन यांनी विशेष परिश्रम घेतले.