
कोपरगाव : – “विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्यास प्रथम प्राधान्य देताना जागतिक पातळीवर वाढत्या आय.टी. क्षेत्रातील संधी, उद्योग जगतातील आवश्यक कौशल्ये, वेळेचे काटेकोर नियोजन, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्ये या सर्वांस गुणांसह विद्यार्थ्यांनी भविष्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी तयार असावे”. असे प्रतिपादन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय,कोपरगाव येथील माहिती तंत्रज्ञान विभागातील तज्ञ प्राध्यापक प्रा. राजेंद्र कंक्राळे यांनी केले.
ते एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्लेसमेंट व करिअर कौन्सिलिंग सेलच्या सहकार्याने आयोजित ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी’ कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम भगत यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी डॉ.रोहित निकम यांनी, “विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार संधीची माहिती देत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा सोबतच प्रात्यक्षिक कामकाज, प्रकल्प शिक्षण, तसेच इंटर्नशिप द्वारे मिळणाऱ्या ज्ञान प्राप्तीकडे लक्ष द्यावे”, असे सुचविले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ. घन:श्याम भगत यांनी, “विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निग’ स्पर्धात्मक युगात आवश्यक त्या कौशल्यानिशी टिकून राहणे गरजेचे आहे,असे सांगितले.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व कार्यशाळेमागील उद्देश प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी स्पष्ट केला. प्रस्तुत कार्यशाळेसाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट आणि करिअर कौन्सेलिंग सेलचे चेअरमन प्रा. दिलीप भोये, संगणकशास्त्र प्रमुख प्रा. प्रतीक्षा रोहोम, संगणक शास्त्रविभागातील सर्व प्राध्यापक, विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. पल्लवी आहेर व कु. साक्षी सांगळे यांनी केले. तर आभार कु. ईश्वरी कर्डिले हिने मानले.