
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड; विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव
कोपरगाव : – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राज्य पत्रकार संघ मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदी ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप, तर कोपरगाव तालुकाध्यक्षपदी पत्रकार प्रा. विजय कापसे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजय भोकरे, जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे व जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी दिली आहे.
जनार्दन जगताप हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. ते सध्या दैनिक सार्वमत व दैनिक वीरभूमीचे कोपरगाव प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकार संघटनेतही त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. मागील २ वर्षे त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम करताना अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले. विशेषतः महिला दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा सन्मान करून त्यांनी राज्यभरात वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर आता जिल्हा सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तर प्रा. विजय कापसे हे गेल्या ९ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून अनेक उपेक्षित प्रश्नांना व विकासकामांना सातत्याने वाचा फोडत आहेत. ते पेशाने शिक्षक असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. ते दैनिक लोकमंथन या वृत्तपत्राचे कोपरगाव प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. कापसे यांनी यापूर्वी संघटनेत सहसचिव, कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. मागील २ वर्षांपासून त्यांनी सचिव म्हणून संघटनेचे काम प्रभावीपणे पुढे नेले. पत्रकार बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.
जगताप आणि कापसे या दोन्ही पत्रकारांनी पत्रकार बांधवांच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याने त्यांच्या निवडीकडे कार्याची पावती म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील पत्रकार बांधवांसह राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.