
कोपरगाव :- येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात ‘वाचन प्रेरणा दिन’ वाचन कक्षात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, माधव सरोदे यांनी भूषविले.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. संतोष पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, “ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वाचन संस्कृतीचा पाया घालण्याचा दृष्टीने आपला जन्मदिवस हाच ‘वाचन प्रेरणा दिन’ असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जगातील थोर तत्त्ववेत्यांनी जो विचार सांगितला, तो सुरुवातीच्या काळात मौखिक स्वरूपात होता तरीही जगाने तो पाठ करून पुढच्या पिढ्यांना ऐकवला विविध विचारवंत आणि त्यांचे विचार हेच समाजाला नियंत्रित आणि नियमित करतात, पुस्तक वाचल्याशिवाय ते आपल्याला समजू शकत नाही.” यावेळी कु.आहेर पल्लवी, कु.सांगळे साक्षी, कु. कदम वैष्णवी, कु. खटकाळे पूजा, कु. त्रिभुवन पूजा यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राचे सामुहिक वाचन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अध्यक्षीय मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी डॉ. अब्दुल कलामांच्या जीवन कार्याची आठवण देऊन वाचनाचे महत्व सांगितले. त्यांना मिसाईल मॅन म्हणून का ओळखले जाते? याबद्दल सांगून, वाचनातून चिकित्सक वृत्ती निर्माण होते. दृष्टी वाचायला मदत करते तर; वाचन दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम करते. आजच्या काळात डिजिटल युगाचा वापर विद्यार्थ्यांनी माहिती घेण्यासाठी करावा. केवळ लाईक, शेअर यासाठी करू नये. काळानुसार वाचनाची माध्यमे बदलली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झाले नाही, शरीरासाठी जसा व्यायाम महत्त्वाचा आहे तसे मेंदूसाठी वाचन महत्त्वाचे आहे. आताही भविष्य घडविण्यासाठी वाचनाचीच गरज आहे, असे सांगून या वाचनाच्या जोरावरच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लाभलेले, राष्ट्रपती झालेले डॉ. कलाम हे पहिले शाखश, राष्ट्रपती आहेत याची जाणीव करून दिली आणि विद्यार्थ्यांनी वाचनाचा संकल्प करावा असे आवाहन केले,
डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर खैरनार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कनिष्ठ विभागचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपस्थितांचे आभार प्रा. उज्ज्वला भोर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले.