
कोपरगाव:- कोपरगाव–जुना टाकळी रोड नाका येथील एम.डी.आर-९९ क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्ता न केल्यास बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा मुर्शतपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी (सार्वजनिक बांधकाम विभाग), कोपरगाव यांना लेखी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात जाधव यांनी नमूद केले आहे की, सर्वे नं. २०४ मधून गेलेला एम.डी.आर-९९ हा रस्ता जुना टाकळी रोड नाका ते नक्षत्र मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्के व कच्चे गाळे, बांधकामे उभी राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या रस्त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेच्या नगररचना विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाऊन प्लॅन नकाशानुसार ठरावीक लांबी-रुंदीप्रमाणे रस्ता मोकळा करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत संबंधित रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटवून दर्जेदार रस्ता तयार न केल्यास, कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता बेमुदत अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा विजय जाधव यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.