
कोपरगांव:-समाजामध्ये ठगविणांऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणांत आहे, माझे कसे होईल, मुला – बाळांचा संसार प्रपंच नीटनेटका होईल की नाही, शिक्षणात मुले उत्तीर्ण होतील की नाही, विवाह आदि समस्यांची सोडवणुक होण्यासाठी महिला भाविकांच्या अज्ञानाचा गैरफायदा भोंदुबाबा घेत आहेत तेंव्हा भोळ्या भाबडया भाविकांनी त्याबाबत वेळीच सावधानता बाळगा. परमेश्वर हाच आपला सखा मार्गदर्शक आहे, त्याच्या नामस्मरणांतुन भक्तीचा साठा वाढवा, नवनाथ भक्ती करा म्हणजे जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग सापडेल असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य शिरीष महाराज यांनी केले.
येथील मुंबादेवी तरूण मंडळाच्या वतीने ३२ वर्षापासुन रामनवमीनिमीत्त साईगांव पालखी सोहळयाचे आयोजन केले जाते त्यानिमीत्त संत ज्ञानेश्वर नगर तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे नवनाथ भक्ती कथासारचे चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी लोककलावंत शुभम बोराडे याने बहारदार शीव तांडव नृत्य सादर केले त्याबददल त्यांचा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम व साईगांव पालखीच्यावतींने मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी सत्कार केला.
आचार्य शिरीष महाराज पुढे म्हणाले की, पुर्वी कुटूंबात अर्थप्राप्ती कमी होती पण सुख-समाधान मोठे होते आज उलट स्थिती आहे, प्रत्येकाची हाव वाढली आहे. त्यातुन भौतिक गरजा वाढल्या आहेत. मुला-मुलींना पुर्वी भौतिक गरजेच्या वस्तु कमी होत्या तरी शिक्षणात ते अव्वल होते पण आज प्रत्येक पाल्याचे हवे ते लाड माय-बाप पुरवतात आणि तेच आपल्या मुलांना बिघडवत आहेत तेंव्हा प्रत्येक आई-वडीलांनी आपल्या मुला-मुलींकडे वेळीच लक्ष द्यावे., त्यांचे लाड कमी करावे, योग्य वयात योग्य संस्कार द्या, अन्यथा तेच मोठे झाल्यावर आपल्यावर वळ उठवतील. आपल्या अवती भवती काय घडते यावर लक्ष केंद्रीत करा. आपल्या घरात काय चालले हे आपल्यापेक्षा शेजारच्याला अधिक माहिती होते. समाज मानसिक स्वास्थ हरवुन बसला आहे त्यामुळे भोंदुगिरीचे अनेकजण शिकार होत आहेत. भोंदुबाबाला त्याचे स्वतःचेच भविष्य माहित नसते तो काय तुमचे भविष्य सांगणार. या भुतलावर भगवंताने साधु-संतांच्या रूपातुन अनेकांना भक्तीचा मार्ग दाखविला आहे. संतांचे चरित्र हे देवापेक्षाही गोड आहे. साधु आपल्याला नेहमीच सन्मार्ग दाखवितात. हल्लीच्या पिढीने रामरक्षा, गीता, हनुमान चालिसा, गणेशभक्ती, गजाननविजय, गुरूचरित्र-नवनाथ पारायण आदि अध्यात्मीक साहित्यातुन संस्कार आत्मसात करावेत. भगवंत नामस्मरण हेच चिरकाल टिकणारे आहे. मोह-माया खुप वाईट आहे. एकवेळ बाहेरचे युध्द थांबविता येईल पण मनाचे युध्द पेटले तर ते थांबविता येत नाही, गहिनीनाथ, कानिफनाथ यांच्या जन्मकथांचे यावेळी सविस्तर विवेचन करण्यांत आले. बडेदादा गुरू महाराज मच्छिंद्रनाथ की जय, हर हर महादेव, राधे, राधे या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.