
कोपरगांव : – जोपर्यंत धनदौलत बरोबर आहे तोपर्यंतच नाती आपल्याबरोबर असतात, पण धनदौलत संपली की नातीही संपून जातात, पण भगवंत मात्र शेवटपर्यंत असतो तेव्हा प्रत्येकाने भगवंत भक्तीत लीन व्हावं. गोमातेची सेवा प्रत्येकाने करावी असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य शिरीष महाराज यांनी केले.
येथील मुंबादेवी तरूण मंडळाच्यावतीने ३२ वर्षापासुन रामनवमीनिमीत्त साईगांव पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते त्यानिमीत्त संत ज्ञानेश्वर नगर तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे नवनाथ भक्ती कथासारचे तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
आचार्य शिरीष महाराज पुढे म्हणाले की, हल्लीच्या कलियुगात माणसं भगवंताला धोका देतात, गुरु नेहमी सर्वांना सन्मार्ग दाखवतात. जोपर्यंत भगवंताचा भाव भक्तात प्रकट होत नाही तोपर्यंत आपली प्रार्थना कधीच पूर्ण होत नाही. देता-घेताना नेहमीच विचार करावा. कुणाचे फुकट काही घेऊ नये. हल्लीच्या काळात चेले प्रचंड बिघडले आहे, सत्संगात कुठलेही शिष्य बसत नाही. गोमातेचे प्रचंड हाल सुरू आहेत. लोककलावंत शुभम बोराडे याने काली माता कलकत्तेवाली या गीतावर बहारदार नृत्य सादर करत भाविकांची मने जिंकली. आचार्य शिरीष महाराज यांनी गोरक्षनाथाच्या जन्माची संपूर्ण कथा यावेळी भाविकांना सांगितली. भूत, वेताळ, अतृप्त आत्मे यांनी मच्छिंद्रनाथांना कसा त्रास दिला आणि त्यावर त्यांनी कशाप्रकारे मात केली याचेही वर्णन यावेळी सांगण्यात आले. फेसबुकच्या माध्यमातून चार देशातील भाविक आचार्य शिरीष महाराज यांची नवनाथ भक्तिसार कथा थेट ऐकतात.