
कोपरगाव : गत आर्थिक वर्ष अखेर १००० कोटी रुपये ठेवीचा टप्पा समता पतसंस्थेने ओलांडला होता. दि.३० मार्च २०२६ अखेर ११०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओलांडुन समताच्या एकुण ठेवी ११३० कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहे. आर्थिक वर्ष अखेर समता पतसंस्थेची आर्थिक पत्रके ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा गेल्या ४० वर्षापासुन कायम राखली असुन याही वर्षी ३१ मार्च २०२६ ला शासकीय सुटटी असल्याने दि.३० मार्चला आर्थिक पत्रके जाहीर करत असुन समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४% ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित आहे असे समताचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी सांगितले.

ही आर्थिकपत्रके जाहीर करतांना समताचे आणखी काही वैशिष्टये त्यांनी सांगितले आहे. सहकार खात्याने घालुन दिलेल्या निकषांप्रमाणे वैज्ञानिक तरलता २५% राखणे आवश्यक असतं ती दि. ३० मार्च अखेर २७.५२% इतकी म्हणजे ३११ कोटी रुपये इतकी गुंतवणुक राखली आहे. या व्यतिरिक्त रोख तरलता १ टक्का राखणे आवश्यक असते. ही ११ कोटी ७२ लाख इतकी राखली आहे. समताचे एकूण कर्ज वाटप ८२५ कोटी रुपये आहे. तसेच समताचा संमिश्र व्यवसाय २ हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे.
गत आर्थिक वर्षात समताच्या नफ्यामध्ये भरघोस वाढ झालेली असुन हा नफा ८ कोटी २५ लाख रुपयांच्या पुढे पोहचला आहे. दि.११ मे १९८६ रोजी स्थापन झालेल्या समता पतसंस्थेला यावर्षी ४० वर्ष पुर्ण होत आहे. गत ४० वर्षात कायम “अ” वर्ग प्राप्त झालेल्या समताच्या सभासदांना यावर्षी १५% लाभांश देण्याचा निर्णय वर्ष अखेर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तसेच समता पतसंस्थेने वयाची चाळीशी ओलाडतांना गत ४० वर्ष सातत्याने सभासद असलेल्या सभासदांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करणार असल्याचे समताचे व्हा. चेअरमन श्री.अरविंदभाई पटेल व जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांनी सांगितले.
समता पतसंस्थेचे चेअरमन व राज्यातील पतसंस्था चळवळीचे मार्गदर्शक श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे अध्यक्षतेखाली समताची घोडदौड यापुढे अशीच चालु राहील असा विश्वास समता पतसंस्थेच्या महिला संचालिका सौ.श्वेता अजमेरा व सौ.अक्षरा पटेल यांनी व्यक्त केला. तसेच समता पतसंस्थेने संचालक मंडळात तरुणांना स्थान दिल्यामुळे समतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्याचे समताचे तरुण संचालक श्री. निरव रावलिया, दिपक अग्रवाल व गिरीष सोनेकर यांनी या प्रसंगी सांगितले.
समताने थकबाकी वसुलीत देखील नेहमीप्रमाणे विक्रम केला असुन कोणत्याही थकबाकीदारांची तक्रार न येता अत्यल्प थकबाकी ठेवण्यात समताला यश मिळाले असल्याचे वसुली विभागाचे व्यवस्थापक श्री. जनार्दन कदम यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या कोपरगांव शाखेच्या ठेवी ४०० कोटी रुपयांच्या पुढे पोहचल्या असुन श्रीरामपुर शाखेच्या ११० कोटी रुपयांच्या पुढे तर राहाता शाखेच्या १२५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत. येवला शाखेच्या ६० कोटी रुपयांच्या पुढे ठेवी असुन शिर्डी शाखेच्या ५५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत. समताचा शाखा विस्तार २७ शाखांपर्यंत पोहचला असुन पुढील आर्थिक वर्षात ४० शाखांपर्यंत नेण्याचा संकल्प समताच्या संचालक मंडळाचा आहे.
नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने सहकारा अंतर्गत सहकार या धोरणाला प्राधान्य दिलेले आहे. या धोरणा अंतर्गत देशातील विविध कार्यकारी सोसाट्यांना १५० प्रकारचे विविध व्यवसाय करण्याची परवानगी मिळालेली आहे. या अंतर्गत समता पतसंस्थेने कोपरगांव शहरातील नावाजलेली कोपरगांव तालुका प्रगत सहकारी सोसायटी चे व्यवस्थापनाची जबाबदारी समता पतसंस्थेने स्विकारलेली आहे. कोपरगांव तालुका प्रगत सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. वैभव सुर्यभान गिरमे, व्हा. चेअरमन-श्रीमती जयश्री अनिल बोरावके व सर्व संचालक मंडळाने यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे समताच्या ४० व्या वर्षात कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी अनेक व्यवसायिक व सामाजिक कामे करण्याचा संकल्प समताच्या संचालक मंडळाने केला असल्याचे संचालक कचरू मोकळ यांनी सांगितले.