
कोपरगांव :- स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारातुन जगाला कार्यचेतना दिली, आजचा युवक राष्ट्राची महान संपत्ती आहे, त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे. समर्थ रामदासी स्वामींनी गांवोगांवी मारूतीची स्थापना करून युवाशक्तीला बलोपासनेची शिकवण देत अध्यात्माबरोबरच धर्म जागृतीचे कार्य केले. आपला देश महापुरूषांच्या विचारांनी समृध्द झालेला आहे त्यापासुन प्रेरणा घ्यावी असे आवाहन प्रेरक वक्ता, योगतज्ञ, व प्रेरणा पुरस्कारप्राप्तकर्ते दामोदर प्रकाश रामदासी (पुणे) यांनी केले.

समर्थ मठ खातगांव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) च्या पादुकांचे अधिक पुरूषोत्तम मासानिमीत्त कोपरगांवी आगमन झाले त्याप्रसंगी शहरातील दत्तपार येथे पवन व सौ. दिप्ती अंभोरे यांच्या हस्ते सामुहिक पुजन करण्यांत आले

त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी समर्थभक्त सुप्रसिध्द किर्तनकार प्रसादबुवा रामदासी यांनी प्रास्तविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, समर्थ रामदासांनी श्रीलंकेत मारुतीची स्थापना करून तेथे संत्राने, उड्डाणे आरती लिहिली. समर्थ रामदास स्वामींनी स्वतःचा प्रपंच न करता राष्ट्राचा प्रपंच केला, शुभमंगल सावधान म्हणताच त्यातून आत्मबोध घेतला. धर्म जागृतीसाठी 1100 मठांची स्थापना करत अनेकांना राष्ट्र प्रेरणेचा विचार दिला. लहान मुलांनी संस्कार आत्मसात करावे, दासबोधाचे पारायण करावे, आयुष्य दुर्लभ आहे, जी संधी परमेश्वराने दिली तिचे सोने करा, समर्थ देण्यासाठी आले आहेत त्यांची झोळी सामर्थ्याने संपन्न आहे, ती आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रह्मलीन संत रामदासी महाराज यांनी गीता, मारुती स्तोत्र, योगोपासना, समर्थांच्या प्रचाराने प्रसाराचे महान कार्य केले आहे. तीनखणीत रामदासी बाबांची तपश्चर्याची ऊर्जा आहे. अधिकमासामध्ये आम्हास श्रीक्षेत्र कोपरगाव कोकमठाण, कोपरगाव बेट, संवत्सर येथे पादुका घेऊन येण्याचा योग आला, समर्थ भक्तांनी अपेक्षेपेक्षा अधिक अध्यात्म जनजागृती केली. दक्षिणगंगा काशी गोदावरी चा काठ कोपरगाव ऐतिहासिक नगरीला लाभला हे परमभाग्य आहे. कोपरगाव बेट संजीवनी मंत्र विद्येचे स्थान गुरु शुक्राचार्य याचेही दर्शन झाले. कचेश्वर, शृंगेश्वर, चक्रधर स्वामी, यासह कोपरगाव शहरातील विविध मंदिरे पाहून समाधान वाटले.


प्रेरक वक्ता दामोदर रामदासी पुढे म्हणाले की, सन २००२ पासुन आपण मुल्य शिक्षण, व्यक्तीमत्व विकास, आनंदी मानसिकता, ध्यान या विषयावर संपुर्ण महाराष्ट्रभर कार्यशाळा घेवुन समर्थ रामदास स्वामींची विचारधारा, स्वामी विवेकानंदांचे विचार प्रचार आणि प्रसार करत आहे. आजचा युवक भरकटलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यात आपण मागे राहुन चालणार नाही. स्वामी विवेकानंदांनी आपल्या सर्वांना जी शिकवण दिली आहे ती आत्मसात करावी. प्रत्येकाच्या अंर्तमनांत प्रचंड शक्ती आहे. स्वतःबरोबरच इतरांसाठीही जगा. प्रत्येक शुभकार्यात नव वधू-वरांना आहेर करताना त्यात रामायण, महाभारत, दासबोध, गीता, रामचरीत मानस आदी धार्मिक ग्रंथाचा समावेश असावा, दासबोधामध्ये संसार आणि परमार्थ कसा करावा याची शिकवण दिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. ताण तणाव घेऊ नका, परीक्षेतील गुणांची स्पर्धा मर्यादित ठेवा त्यातून विद्यार्थ्यांना त्याचा मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या, दुसऱ्याबरोबर आपली स्पर्धा करू नका, समर्थ रामदास स्वामी व श्रीधर स्वामी पादुकांचे तीन दिवस घरोघर पुजन करून युवाशक्तीच्या आत्मविकासासाठी त्यांनी मार्गदर्शनही केले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी ब्राम्हण सभा कोपरगांव, रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाण, दत्त भक्त मंडळ कोपरगांव यांनी विशेष परिश्रम घेतले. शुक्रवारी या पादुकांचे जालना येथे प्रस्थान झाले.