Homeकोपरगावमहाविद्यालयीन संस्कारांमुळेच वैद्यकीय क्षेत्रात यश मिळाले : डॉ. गोवर्धन हुसळे

महाविद्यालयीन संस्कारांमुळेच वैद्यकीय क्षेत्रात यश मिळाले : डॉ. गोवर्धन हुसळे

कोपरगाव: – “जगात कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने आपल्या मूळाशी नाते जपले पाहिजे. झाड कितीही उंच वाढले तरी त्याचे अस्तित्व जमिनीतील मुळांवरच अवलंबून असते. त्याचप्रमाणे एस.एस.जी.एम. महाविद्यालय ही माझ्या आयुष्याची सुपीक भूमी असून येथील संस्कार माझी खरी ताकद आहेत. विज्ञान आपल्याला ज्ञान देते, परंतु मूल्ये त्या ज्ञानाला योग्य दिशा देतात. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.”, असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे माजी सदस्य डॉ. गोवर्धन हुसळे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आरोग्य समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय डॉक्टर दिन कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे यांनी भूषविले.

ते पुढे म्हणाले की,“एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मला केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान मिळाले नाही, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबन, समाजसेवा, समर्पण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या विचारांचा वारसा लाभला. याच महाविद्यालयाने मला निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे आणि चिकित्सक विचार करण्याची दृष्टी दिली. बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षापासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास मला वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीपर्यंत घेऊन गेला. महाविद्यालयात मिळालेली शिस्त, संस्कार आणि जीवनमूल्ये हीच माझ्या दीर्घ वैद्यकीय सेवाकार्यातील भक्कम पायाभरणी ठरली. आयुष्यात आहार विहार आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत असे स्पष्ट केले.

यावेळी अंकित कृष्णानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी केवळ डॉक्टरांची नसून प्रत्येक व्यक्तीची स्वतःचीही आहे. निरोगी जीवनासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि आरोग्याविषयी जागरूकता आवश्यक आहे. वैयक्तिक स्वास्थ्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतः पार पाडल्यास अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य होईल.

मार्गदर्शन करताना डॉ. सतीश अजमेरे म्हणाले की, व्यक्तीचे आयुष्य घडवण्यात वैयक्तिक अनुभव, पूर्वीचे शिक्षण, सध्याचे ज्ञान आणि सतत आत्मसात केली जाणारी नवीन कौशल्ये यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. काळ झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रांतील स्पर्धाही वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा कल, क्षमता आणि मर्यादा ओळखून योग्य क्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. विविध व्यवसायांच्या संधी, वैयक्तिक आवड, सातत्यपूर्ण अभ्यास, स्पष्ट संकल्पना आणि वेळेचे योग्य नियोजन या बाबी यशस्वी आयुष्याची पायाभरणी करतात. योग्य दिशा आणि प्रयत्नांच्या बळावर प्रत्येकाला स्वतःचे भविष्य घडविता येते.

सदर प्रसंगी डॉ.विलास आचारी, डॉ. वैभव गवळी, डॉ. अभिजीत आचारी, यांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक व महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली

अध्यक्षीय मनोगतात ॲड. संदीप वर्पे यांनी, “राष्ट्रीय डॉक्टर दिन हा भारतात दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. देशातील डॉक्टरांनी आरोग्यसेवा, रुग्णसेवा आणि समाजाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी मुख्यमंत्री बिदनचंद्र रॉय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. डॉक्टरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असून, रुग्णांच्या उपचारांमध्ये त्यांच्या ज्ञानासोबतच सेवाभाव, संवेदनशीलता आणि समर्पण यांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळेच “डॉक्टरांच्या हातालाही गुण असतात” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सतीश अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. शीतल आव्हाड, डॉ. अभिजीत आचारी, डॉ. उमेश कोठारी, डॉ . योगेश कोठारी, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ.गोविंद भोसले, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. हर्षद आढाव, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. योगेश लाडे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. वरद गर्जे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ अर्जुन भागवत , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्रास्ताविकात आजचा दिवस हा वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉक्टरांकडे केवळ व्यावसायिक म्हणून न पाहता ‘वैदो नारायण हरी’ या उक्तीप्रमाणे समाजसेवक म्हणून पाहिले जाते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून ते कार्य करत असल्याने भारतीय संस्कृतीत वैद्यकीय क्षेत्राला आणि डॉक्टरांच्या सेवेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे,असे म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र हिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य सेवा समितीच्या प्रमुख डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!