
संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यात सध्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत झाला आहे मात्र त्यावरुन आमदार काळे गट प्रत्येक प्रश्नात श्रेय लाटू पहात आहे.एकीकडे अध्यक्ष होण्यापूर्वी निळवंडेचा एक थेंबही पाणी कोपरगांव शहराला मिळू देणार नाही अशी भुमिका घेतली होती ते सार्इसंस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून शिर्डी व कोपरगांवसाठी पाणी आणून दाखवावे अन्यथा पाणी प्रश्नावरुन सध्या जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे भाजपाचे जेष्ठ नेते व प्रवक्ते पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की,गेल्या कांही दिवसापासुन वृत्तपत्र सोशल मिडीयावरुन काळे गटाचे हस्तक कोपरगांव नगरपालिकेच्या पाच नंबर साठवण तलावासंदर्भात आपली राजकीय पोळी भाजुन घेण्याकरीता कोल्हेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात कोल्हे यांचा कुठलाही संबंध नसताना कोल्हेंवर विनाकारण आरोप केले जातात या याचिकेची माहिती घेतली असता त्यात कोपरगाव तालुक्यातील शेतकरी शेती सिंचनाचे पाणी कमी होत असल्याने औरंगाबाद खंडपिठात गेले आहेत.
काळे गटाच्या हस्तकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले की,सदर याचिकेत कोल्हे यांनी आठ वकील लावले,असे म्हणणार्यांनी त्या वकीलांची नांवे जाहिरपणे सांगावी तसेच कोल्हे यांचा या याचिकेशी काय संबंध आहे याचे पुरावे त्यांनी सिध्द करावे करावे,जनतेची व कोल्हेंची माफी मागावी अन्यथा आम्ही आरोप करणार्यावर अब्रुनुकसानीचे दावे दाखल करणार असल्याचे संधान यांनी सांगून विरोधकांनी सातत्याने कोल्हे गटाला या न त्या कारणाने लक्ष करायचे हे उद्योग बंद करावे.
शहराच्या ज्वलंत पाणी प्रश्नावर स्व.शंकरराव कोल्हे यांनीच पालिकेला सर्व पाच साठवण तलावासाठी जागा खरेदी करून दिलेल्या आहेत, त्याच प्रमाणे पाच नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून आमच्या नगरसेवकानी दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रोजी ठराव कमांक पाच अन्वये सर्व मंजुर्या दिलेल्या आहेत व त्यांची सात लाख रूपये निरिक्षण फी देखील त्याचवेळेस भरलेली आहे.
तत्कालीन आमदार अशोक काळे यांच्या काळात सन 2005 चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत झाला तेव्हापासूनच कोपरगांवच्या पाण्यावर टाच बसली आहे. कोपरगाव शहराच्या नागरिकांकरीता स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरावा म्हणून निळवंडे शिर्डी कोपरगाव अशी जलवाहिनी पाणी योजना मंजूर केली परंतु माजी आमदार अशोक काळे व सध्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने निळवंडे पाणी योजनेला खोडा घालण्याचे काम केले असून त्याचा पुरावा सोशल मेडियावर फिरत आहे.हे सर्व जनता पहात आहे एकीकडे पाण्याला विरोध करायचा व दुसरीकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी केलेल्या कामाचे श्रेय लाटायचे व दररोज कोटीच्या कोटी निधी आणल्याच्या वल्गना काळे पितापूत्र करतात.कोल्हेंच्या जिरवाजिरवीत ते सर्वांचीच जिरवत आहे,पाच नंबर तलावाची याचिका फेटाळली हा अपप्रचार देखील खोटा असल्याचे संधान यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक, स्वप्निल निखाडे,भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले,रवि रोहमारे,वैभव गिरमे,दिनेश साबळे,विवेक सोनवणे,दिपक जपे, बापू पवार,अल्ताफ कुरेशी,रोहन दरपेल,सचिन सावंत,दिपक राऊत किरण सुपेकर,विजय चव्हाणके खालिद कुरेशी,गोपी गायकवाड आदि उपस्थित होते.
काळे यांची राजकीय ढकलगाडी कोल्हे यांच्याशिवाय पळतच नाही.
आमदार काळे यांची राजकीय ढकलगाडी कोल्हे यांच्यावर आरोप केल्याशिवाय पुढे जातच नाही असा टोलाही पराग संधान यांनी यावेळी लगावला.