
कोपरगाव – ज्यांच्या नशिबात धार्मिक परिसराचा सहवास लाभला असेल आणि शारदेचा आशिर्वाद लाभला असेल अशी माणसं साहित्यिक होतात. सुखी समाधानी माणूस म्हणून जगताना दुसऱ्याला नेहमी आनंद दिला पाहिजे तो आनंद आपलही जीवन सुखी समाधानी आरोग्य संपन्न करतो” भाविकांना मार्गदर्शन करतांना कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी सांगितले.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर , कोपरगाव शाखेच्या वतीने ग्रामीण भागातील नवोदित लेखकांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून श्रावण मासानिमित्ताने कुंभारी येथील राघवेश्वर मंदिराच्या परिसरात,”श्रावणधारा साहित्यिक मैफलीचे” आयोजन मातोश्री अकॅडमी पाथरे यांच्या वतीने करण्यात आले होते. मैफलीच्या अध्यक्षस्थानी धनश्री महिला नागरी पतसंस्थेच्या जेष्ठ संचालिका सौ ज्योती कोऱ्हाळकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक रमण गायकवाड, संजीवनी इंजीनियरिंग काॅलेजचे ग्रंथपाल सुरेश चतुर आदि उपस्थित होते.

श्रावणधारा साहित्यिक मैफलीचे औचित्य साधून सौ. विजया जाधव
सौ. वृंदा कोऱ्हाळकर, स्वाती मुळे, सौ. शैलजा रोहोम, कवी बाळासाहेब देवकर, प्रमोद येवले, हेमचंद्र भवर यांसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या निसर्ग विषयक, मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणाऱ्या, मानवी नातेसंबंध जपून आपल्या मनातील भावना व्यक्त करणा-या कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
शाखेच्या अध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्षमी संजय सातभाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अजीत कसाब यांनी आभार प्रदर्शन केले. साहित्यिक मैफलीसाठी शहा येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ, कुंभारीचे उपसरपंच, विद्यार्थी, नवोदित साहित्यिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.