
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोपरगाव शहर भारतीय जनता पक्ष व भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज सोमवारी (१६ जानेवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पक्ष व भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,नगर परिषदेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक,भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले आदींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,स्वप्नील निखाडे,भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, गोपीनाथ गायकवाड,वैभव आढाव, दीपक जपे,विजय चव्हाणके,सतीश रानोडे,शंकर बिऱ्हाडे,सोमनाथ म्हस्के, संतोष साबळे,मनिंदर सिंग खालसा, भैय्या नागरे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी,माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पराग संधान म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे सुसंस्कृत, पराक्रमी,बुध्दिमान,नीतिमान,धैर्यवान राजे होते.एका हातात तलवार आणि दुसर्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे संभाजीराजे हेदेखील पिता छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच शौर्याचे आणि साहस असणारे दैदिप्यमान राजे होते. लहानपणा पासूनच छत्रपती शिवाजी महाराजां सोबत युद्धभूमीवर राहून ते युद्धकलेत तसेच मुत्सद्देगिरीत पारंगत झाले होते. संभाजीराजे जसे रणांगण गाजविणारे होते,तसेच ते राजनीती,डावपेच यामध्येदेखील निपुण होते.यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब या शत्रुसोबत सुमारे १२० युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात स्वराज्याच्या शत्रूला पराभवाला सामोरे जावे लागले.संभाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीत २०१ युद्धे लढली आणि त्यांच्या सैन्याचा एकाही लढाईत पराभव झाला नाही हे विशेष.१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.त्यामुळे १६ जानेवारी हा दिवस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजीराजांनी सर्वस्व पणाला लावले. शिवरायांच्या शिस्तबध्द सुराज्याप्रमाणे कारभार केला.आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही,याची दक्षता त्यांनी घेतली.छत्रपती संभाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ता,शौर्य आणि बलिदान यासाठी त्यांचे तेजस्वी प्रतीक आहेत त्यांचे सैदव आपण स्मरण केले पाहिजे अशी भावना उपस्थितांनी अभिवादन करतांना व्यक्त केली.