
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयात'जागतिक महिला दिन'विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यासाठी दि.६ मार्च २०२३ रोजी'करूया जागर स्त्री शक्तीचा'या प्रा. उज्ज्वला भोर लिखित पथनाट्याचे सादरीकरण मोहन कुर्हे, अभिजीत बाविस्कर,बुशरा शेख,ऋतुजा खर्डे,समिक्षा डिब्रे, वैष्णवी शिंदे इ.विद्यार्थ्यांनी केले.तसेच'स्त्रीभ्रूण हत्या','मुलगी जगवा,मुलगी शिकवा','स्त्री सन्मान'अशा विविध विषयांवर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी,“केवळ पुस्तकी शिक्षण एवढेच ध्येय न ठेवता अशा विविध उपक्रमात सहभागी व्हावे.आपल्या कलागुणांना वाव देऊन त्यांची जोपासना करावी.त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो.”अशा शब्दात विद्यार्थ्यांना संबोधित करून कमी वेळात तयारी करून पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व देखण्या रांगोळी काढणारांचे कौतुक केले.व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या
महाविद्यालयात बारावी बोर्ड व पदवीच्या परीक्षा चालू असून ब्लॉकची संख्या जास्त असल्याकारणाने ८ मार्चचा' जागतिक महिला दिन'कार्यक्रम दिनांक ९ मार्च रोजी घेण्यात आला.याप्रसंगी मगर ऐश्वर्या-राजमाता जिजाऊ,पाईक श्रुती -लता मंगेशकर,बैरागी प्रज्ञा-राणी लक्ष्मीबाई,खर्डे ऋतुजा- सिंधुताई सपकाळ,पानगव्हाणे निकिता-आनंदीबाईजोशी याप्रमाणे विद्यार्थिनींनी वेशभूषा सादरीकरण केले.खर्डे ऋतुजा हिने सादर केलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या सादरीकरणाने सर्वांना खिळवून ठेवले.याप्रसंगी चव्हाण गौरी हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा.उज्ज्वला भोर यांनी आपल्या व्याख्यानातून जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून ध्येय निश्चिती,ते गाठण्यासाठी करावयाचा अभ्यास व घ्यावयाचा ध्यास आणि ध्येय साध्यतेसाठीची साधना या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करून,रूपकात्मक गोष्टीद्वारे उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाष्य करताना उपप्राचार्य सुभाष रणधीर यांनी,पुस्तकांच्या दोन पुठ्ठ्यात व्यक्तिमत्व घडत नाही.इतर कलागुणांच्या जोपासणेतूनच ते घडते.त्यासाठी संस्कार करावे लागतातआणि हे करण्याचे काम महाविद्यालयात अशा कार्यक्रमांद्वारे केले जाते,असे सांगून स्त्री- पुरुष दोघेही व्यक्ती असल्या तरी कालौघात स्त्रीकडे दुय्यमत्व कसे येत गेले,धर्मग्रंथांचे लेखन प्रामुख्याने पुरुषांनी केलेले असल्यामुळे तिला अनेक बंधने कशी टाकली गेली,बुद्ध ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांनी या बंधनातून मुक्त करण्यासाठी कसे प्रयत्न केले,याविषयी उद्बोधक माहिती दिली.
कार्यक्रमा दरम्यान रांगोळी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त खरात अश्विनी,अनर्थ ऐश्वर्या,पानगव्हाणे निकिता आणि वेशभूषा सादरीकरण स्पर्धेतील विजेते मगर ऐश्वर्या,वैरागी प्रज्ञा, खर्डे ऋतुजा या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.प्रा.अक्षय आहेर,प्रा.बनसोडे,प्रा.डॉ.प्रतिभा रांधवणे,डॉ. वैशाली सुपेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगीता दवंगे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सीमा चव्हाण यांनी केले उपस्थितांप्रती योगिता भिलोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक,शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.