
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – तालुक्यातील जेऊरकुंभारी येथील बालब्रह्मचारी, संन्यासी, ह.भ.प.विठ्ठल नामदेव महाराज वक्ते वय (६७) यांचे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर धानोरे तालुका निफाड येथे विविध संत महंत भाविक,अनुयायी, शिष्य आदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे ते गुरुबंधू होते.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी व जेऊरकुंभारी येथील रहिवासी पंडितराव वक्ते यांचे ते मोठे बंधू तर औरंगाबाद खंडपीठाचे विधीज्ञ विनायकराव होन यांचे मामेसासरे होते. त्यांच्या मागे पाच बंधू,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
या अंत्यसंस्कार प्रसंगी हभप रघुनाथ महाराज खटाणे,हभप घोटेकर महाराज,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संजय होन,अरुणराव येवले,बाळासाहेब वक्ते,मधुकर वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते व धानोरे परिसरातील विविध सामाजिक तसेच शैक्षणिक अध्यात्मिक संस्थेचे मान्यवर आदी उपस्थित होते.त्यांचा षडशीविधी धानोरे येथे २६ मे रोजी सकाळी दहा वाजता हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने,विविध संत महंतांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे,तत्पूर्वी पाच दिवस धानोरे येथे दररोज सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बालब्रह्मचारी विठ्ठल महाराज वक्ते व रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत एकत्र शिक्षण घेतले होते.ह भ प विठ्ठल महाराज वक्ते यांनी तुकाराम बाबा खेडलेकर,गोविंद महाराज, माऊली बाबा,कदम महाराज, काशिनाथ महाराज यांच्या सानिध्यात राहून धानोरे येथील विविध आध्यात्मिक संस्थांचा विकास केला होता.ते नेहमीप्रमाणे आपली दिनचर्या आटोपून सोमवारी धानोरे येथे प्रवचन पसायदान कार्यक्रम करून सायंकाळी येवला तालुक्यातील धनकवडी येथे सप्ताह कार्यक्रमासाठी प्रवासाला जाण्याच्या तयारीत होते त्यातच त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला,त्यांच्या शिष्यांनी त्यांना दवाखान्यात नेले मात्र त्यातच त्यांचे प्राणोतक्रमण झाले.संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा शिष्य परिवार पसरलेला आहे,अंत्यसंस्कार समयी नाशिक,संभाजीनगर,अहमदनगर, नागपूर जिल्ह्यातील विविध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.२६ मे रोजी शोडशीविधी निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी यास उपस्थित राहावे असे आवाहन धानोरे ग्रामस्थांनी केले आहे.