
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज,कोपरगाव येथे ‘अविष्कार’ विभागीय संशोधन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अँड. भगीरथ शिंदे हे होते.ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, “संशोधनामुळे ज्ञानाचे प्रदर्शन होते व कल्पना तथ्यांसह जागृत होतात.या स्पर्धेत विद्यार्थी संशोधक नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. हेच संशोधन समाज आणि विद्वानांना विचार करण्यास आणि विविध समस्यावर उपाय शोधण्यासाठी सक्षम बनवते.या स्पर्धेमुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना आपले संशोधन विचार मांडण्याची ही सुवर्णसंधी आहे”.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २००६ पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अविष्कार, अन्वेषण इ.संशोधन विषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते.
अविष्कार नियोजन समितीच्या २०२४-२५ संघ निवडीसाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये नियोजित जिल्हास्तरीय विभागीय संशोधक स्पर्धा एस.एस. जी.एम.महाविद्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित केली होती.या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ संशोधक व उद्योजक व अश्वमेध इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे होते.ते म्हणाले,“डिजिटल क्रांतीचा जनक भारत आहे संशोधन क्षमता ही आपल्या देशातच आहे.येणारा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे.त्याच्या व्याप्तीचा अभ्यास होणे,अत्यंत गरजेचे आहे. महाविद्यालयाने अविष्कार स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे वळवलेला आहे. ही फार गौरवाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.” विभागीय संशोधन स्पर्धेत महाविद्यालयातील घेतलेल्या प्राथमिक फेरीतील निवड झालेल्या संशोधन प्रकल्पांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील सहभाग घेऊन ३०० संशोधन प्रकल्प सादर झाले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ.दत्तात्रेय घोटेकर,प्राचार्य डॉ.माधव देवरे,डॉ.धनराज धनगर डॉ.संजय शेलार, डॉ. कांचन ससाणे,डॉ. रूपाली सानप यांनी काम पाहिले.
या समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत करताना, ‘स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे कारण त्यांच्यामुळेच नव्या युगाचा पाय मजबूत होतो. “कल्पना ते कृती” या प्रवासाला प्रोत्साहन देत,आविष्कार स्पर्धा नव्या जगाचा शोध घेणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांना बळ देते’.असे प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले. पाहुण्यांचा परिचय डॉ.मोहन सांगळे यांनी करून दिला,तर अविष्कार संशोधन स्पर्धेचे संयोजक प्रा.डॉ.विलास गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या समारंभासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.अर्जुन भागवत, प्रा.अरुण देशमुख व संयोजन समितीतील सर्व सदस्य,विविध महाविद्यालयातून आलेले संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली सुपेकर व प्रा.डॉ.सीमा दाभाडे यांनी केले.