
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगांव तालुक्यातील पुर्वीचे ऐतिहासिक गावे शिर्डी व पुणतांबा गमावल्यानंतर पारंपरिक लोकप्रतिनिधी यांचे कोपरगांव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे सुशोभिकरण व प्रेक्षणीय करून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील असे ते उपलब्ध करून देण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव नितिनराव शिंदे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
आपल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे श्री. शिंदे म्हणाले कि,रघुनाथराव पेशवा (१६ डिसेंबर, १७२१ – ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.
कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळेच.रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू.अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष होऊन गेले.त्यांना त्या काळी राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जायचे.दादांना गोदाकाठची फारच आवडत असे, त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते.पहिला बेट- कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून, दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे. तसेच १७८३ मध्ये कोपरगावजवळील ‘हिंगणी’ येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. परंतु, तो पूर्ण होऊ शकला नाही.
१८१८ ला मराठेशाहीच्या पतानानंतर वाडा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी तेथे अनेक प्रशासकीय कार्यालये सुरू केली.मधल्या काळात वाड्यात अनेक फेरबदल व दुरुस्त्या झाल्याने तसेच वाड्याची बरीच पडझड झाल्याने वाड्याची अंतर्गत रचना पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर तेथे मामलेदार कचेरी सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात वाडा पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. पेशवेकालीन वैभवाचा मुक साक्षीदार असणारा हा वाडा काष्टकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात वाड्याची नोंद असून,प्रशासनातर्फे वाड्याच्या डागडुजीचे काम सध्या संथगतीने चालू आहे.स्मारकाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण व बकालपणा हटवून, येणाऱ्या नवीन पिढीला मराठा साम्राज्य शौर्याचा प्रेरणादायी इतिहास नक्कीच उपलब्ध करून द्यावा, व आपल्या सारख्याची ती जबाबदारी आहे,असे राज्याचे मुख्यमंत्री नामदार मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना शिर्डी येथे प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात श्री.नितिनराव शिंदे सचिव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांनी म्हटले आहे.
नवीन पिढीला या इतिहासाची माहिती देणे फार महत्वाचे आहे. कारण: १) अस्मिता जागृती: आपला इतिहास आपल्याला आपली ओळख सांगतो. २) प्रेरणा: इतिहासातील महान व्यक्तींचे जीवन आणि त्यांच्या कर्तृत्वाने नवीन पिढीला प्रेरणा मिळते याचीही पुस्ती श्री. शिंदे यांनी जोडली आहे.