
“भारतातील नैसर्गिक संसाधने आणि शाश्वत विकास:आव्हाने आणि संधी” या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार संपन्न
कोपरगाव : – “पाणी हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय कोणतीही जीवनशैली,शेतकी,उद्योग, आरोग्य किंवा शिक्षण यांचा योग्य विकास होऊ शकत नाही.पाणी केवळ जीवनासाठीच आवश्यक नाही तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठीही ते अनिवार्य आहे तसेच आजच्या काळात नदीजोड प्रकल्प आवश्यक आहे.”असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील भूगोलशास्त्र विभागांतर्गत“भारतातील नैसर्गिक संसाधने आणि शाश्वत विकास: आव्हाने आणि संधी ”या विषयावर बुधवार,दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी आभासी प्रणालीद्वारे वेबिनार संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.

उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे म्हणाले की, “शाश्वत ग्रामीण विकास व शेतीवर होणारे हवामान बदलाचे परिणाम यावर संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे”.
या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ.अमित धोर्डे यांनी, “भारताच्या शाश्वत विकासात अनेक आव्हाने व संधी उपलब्ध आहेत ,या आव्हानांची अभ्यासकांना जाणीव असणे गरजेचे आहे,तिचा फायदा भूगोल अभ्यासकांनी घ्यावा”.असे आवर्जून सांगितले.
समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.सुनील चोळके म्हणाले की,“शाश्वत आणि विकास ही एकच संकल्पना नसून त्या दोन स्वतंत्र संकल्पना आहे,निसर्ग शाश्वत राहिला तरच विकास होणे शक्य आहे”.

यावेळी डॉ.गणेश चव्हाण यांनी नदीजोड प्रकल्प व शाश्वत विकास यांचा आढावा घेतला.डॉ.संजय सांगळे म्हणाले की,शाश्वत विकासासाठी हरितक्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, “वेबिनारचा विषय हा संशोधन व चिंतनपर आहे.शाश्वत विकासासाठी सर्वांनी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे, पुढील पिढीसाठी पृथ्वी आपण सांभाळली पाहिजे,हवामान नियंत्रित ठेवणे, कीटकनाशके,सिंचन व नद्यांचे महत्त्व जाणून त्यांचे संवर्धन करणे, जलसंधारण व त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे त्याचबरोबर सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पर्यावरण पूरक व्यवसाय करणे ही खरी काळाची गरज आहे”.असे यावेळी त्यांनी नमूद केले.
वेबिनारचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंद्रभान चौधरी यांनी केले. व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. देविदास रणधीर यांनी करून दिला. वेबिनारच्या वेगवेगळ्या सत्राचे आभार प्रा.प्रदीप जगझाप,प्रा.जकारिया शेख, प्रा.प्रदीप झोळ यांनी मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन सोनवणे यांनी केले.सदर वेबिनार मध्ये २८३ अभ्यासकांनी सहभाग नोंदवला.