
कोपरगांव 🪐ता.४एप्रिल :- श्रध्देतुन केलेली सेवा कधीही वाया जात नाही, भक्तांच्या अडचणींत परमेश्वर नेहमीच मार्ग दाखवतो असे प्रतिपादन साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्यावतींने श्री शिवमहापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की,श्री शिवमहापुराण कथेतुन माता पार्वतीच्या पतिव्रतेचे महत्व समजते. पार्वतीला माता मैनावती यांनी संसारात अनेक गोष्टींची शिकवण दिली आहे. संसारात हल्ली अनेकदा पती-पत्नीचे खटके उडतात. पत्नीने पतीशी कसे वागावे हे सध्या शिकवावे लागते. पती-पत्नींने एकमेकांना कधीही उलट उत्तरे करू नये. संसार नेहमीच अपुर्ण आहे पण तो गोड करून घ्यावा लागतो. बाप हा वटवृक्ष असतो तर आई नेहमीच अपराध पोटात घेत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडील हेच गुरू तीर्थ आहे. श्रेष्ठ व्यक्तीला स्तुती नकोशी असते पण अहंकारी माणसांना नेहमीच स्तुती प्रिय असते. विचार करणारे आणि विचार करून काम करणारे नेहमीच घातक असतात. निश्चय चांगला ठेवा त्याला निसर्गही साथ देत असतो. स्त्री ने कसे वागावे याबाबत द्रौपदीने महाभारतात बोधपुर्ण विवेचन केलेले आहे. मनुष्याला कथेतुनच नेहमी ईश्वरीय शक्तीचे बोधामृत मिळते असेही त्या म्हणाल्या. गणपती, कार्तिकस्वामीचीही त्यांनी चांगली माहिती दिली. कथेत गायक म्हणून भागवत महाराज शिंदे (लातुर), तबलावादक श्रीराम महाराज दहीफळे (परळीवैजनाथ) तर बँजोवादक म्हणून गौरव महाराज काकडे (वैजापुर) चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा या देखाव्याला भाविकांनी टाळयांच्या कडकडाटात साथ दिली.