
कोपरगांव :- जनमानसात असलेल्या अंधश्रध्दा दुर करून सर्वांना गांवोगांव जावुन स्वच्छतेचे महत्व पटवुन देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा उर्फ डेबुजी झिंगराजी जानोरकर सामाजिक सुधारणांचे संत होते असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक विष्णु वाघ यांनी केले.
संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी यांच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणीचे मुख्याध्यापक श्री. टोरपे यांनी प्रास्तविकात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची माहिती दिली. गाडगे महाराज प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यांत आले.
श्री. विष्णु वाघ पुढे म्हणाले की, राज्यातील अडाणी जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यांत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी मोलाची भुमिका बजावली. माणसामध्ये देव पहा, रंजल्या गांजलेल्यासाठी त्यांनी धर्मशाळा, अनाथालये, विद्यालये उभारली. समाजातील अज्ञान अंधश्रध्दा दुर केल्या. किर्तनातुन जातीभेद अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी समाजप्रबोधन केले. स्वतःच्या संसारापेक्षा त्यांनी समाजाचा संसार फुलविला तेंव्हा पुढच्या पिढीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा इतिहास जाणून घेवुन त्याप्रमाणे मार्गाक्रमण करावे असेही ते म्हणांले. श्री. गुंजाळ सर, तळपे सर, लहरे सर यांनी कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे विष्णु वाघ यांनी लहान मुलांना खाउ वाटप केला.