
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
दोन दिवसांपासून कोपरगाव शहरातील लावणी साम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्या व्यथा मांडणाऱ्या बातमीने कोपरगाव शहरातील वृद्ध कलावंतांचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोपरगाव शहरात फिरणारे मनोरुग्ण यांचा सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड।नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव शहरातील वयोवृद्ध लावणी कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या गाण्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून प्रसिद्ध झाला आणि जुन्या काळात स्टेज गाजवणाऱ्या या कालावंतावर उपासमारीची वेळ आल्याचे वास्तव समाजासमोर आले व संपूर्ण समाजमन ढवळून निघाले.
आज कोपरगाव शहरात असे अनेक मनोरुग्ण दिवस भर गावात फिरत असून मिळेल ते खाऊन जगत आहेत मात्र,कोणताही व्यक्ती अशा प्रकारे विनाकारण फिरत नाही त्यामागे अनेक कारणे असली तरी धावपळीच्या जगात कोणालाच या वयोवृद्ध व्यक्ती व मनोरुग्णांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.मात्र कोपरगाव येथील प्रशासकीय यंत्रणेने सामाजिक संस्थांची मदत घेऊन या मनोरुग्ण व वयोवृद्ध यांचा सर्व्हे करणे आवश्यक असून त्यांच्यावर औषध उपचार व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटावा म्हणून मदत करणे आवश्यक आहे.
आज शांताबाईच्या व्यथा समोर आल्याने अनेक मदतीचे हात पुढे येतील ही मात्र,नव्याचे नऊ दिवस संपल्यावर पुन्हा पूर्वीचेच दिवस येतील मात्र या निमित्ताने शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
या निमीत्ताने कोपरगाव शहरातील सांस्कृतिक चळवळ किती मजबूत होती हे प्रकर्षाने जाणवत आहे मात्र कोपरगाव शहरात अनेक कलावंतांनी गाजवलेल्या नाट्यगृहाची अवस्था देखील अशाच प्रकारे शांताबाई कोपरगावकर यांच्या सारखी दयनीय झाली असून कोट्यवधीचा निधी मंजूर करून व थाटामाटात उदघाटन होऊन देखील कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृह अखेरच्या घटका मोजत आहे.हे खुले नाट्यगृह दुरुस्त करून त्या ठिकाणी अशा कलावंतांचा तात्पुरता निवासाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो मात्र,नगर पालिकेचे गतिमान प्रशासन व मुख्याधिकारी नावप्रमाणे नुसते शांत,अरामच करत नाही.तर नगरसेवक,नगराध्यक्ष असे लोकनियुक्त पदाधिकारी यांचा वचक राहिला नसल्याने सुस्त देखील आहेत. अनेकदा या नाट्य गृहाच्या दुरुस्तीची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
या निमीत्ताने कोपरगाव शहरातही मनोरुग्ण यांचा सर्व्हे व्हावा तात्पुरती मदत करण्यापेक्षा,एके काळी रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणणाऱ्या राणू मंडल व आंबेडकरी गायिका कडूबाई खरात सारखे शांताबाई कोपरगावकर यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन व्हावे वयोवृद्ध कलावंतांना नियमित व वाढीव मानधन मिळावे त्यांच्यावर शासकीय दवाखान्यात नियमित औषध उपचार व्हावे असे आवाहन या पत्रकाद्वारे केली आहे.