
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- पाच वर्षे सर्व प्रकारची सत्ता असताना देखील कोपरगावकरांच्या विकासाच्या समस्या ज्यांना सोडवता आल्या नाही त्या प्रलंबित समस्या आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे कोल्हेंचे राजकीय भवितव्य अंधकारमय झालेअसल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र आभाळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
प्रसिध्दी पत्रकात राजेंद्र आभाळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,कोपरगाव शहर विकासाला नेहमीच आडवे येणाऱ्या कोल्हेंना कोपरगाव शहर व मतदार संघाचा होत असलेला विकास देखवत नसल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रोज कोणीतरी उपटसुंबाच्या नावाने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करणाऱ्या कोल्हेंनी आ.आशुतोष काळे यांच्या विकास कामांचा चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसून येत आहे.ज्यावेळी सत्ता नसतांना देखील आमदार आशुतोष काळे ५ नंबर साठवन तलावाचा आग्रह धरीत होते त्यावेळी कोपरगावकरांना गाजर दाखवून ५ नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी पडद्यामागून कोल्हेंनी सत्तेचा गैरवापर कसा केला हे कोपरगावकरांनी पाहिले आहे अनुभवले आहे.ज्यावेळी प्रत्यक्षात ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाले त्यावेळी देखील हा साठवण तलाव पूर्ण होणारच नाही असा संभ्रम कोपरगावकरांमध्ये निर्माण करण्यात कोल्हेंनी निर्णायक भूमिका पार पाडली असली तरी आ.आशुतोष काळे यांनी अडथळ्यांची शर्यत पार करून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी आणून प्रत्यक्षात साठवण तलावाचे काम सुरू केले.त्यावेळी देखील पंधरा टक्के रक्कम कोपरगावकरांच्या खिशातून जाणार असल्याचा अपप्रचार करण्यात कोल्हे आघाडीवर होते मात्र कमी बोलणारे व जास्त काम करणारे आ.आशुतोष काळे यांनी हा १५ टक्के निधी म्हणजेच जवळपास २० कोटी निधी सुद्धा शासनाकडून मंजूर करून आणला त्यामुळे कोल्हेंचे मनसुबे उधळले जावून त्यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळले गेले.
पाच वर्ष कोपरगावकर त्यांच्या फसवा फसवीला चांगलेच कंटाळले होते आता मात्र त्यांना प्रत्यक्षात टाळत देखील आहेत त्यामुळे आपले भवितव्य अंधकारमय होत चालल्याची जाणीव झालेल्या कोल्हेंना रोज एक उपटसुंब उभा करून त्याच्या नावे प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून विकास कामांबाबत अपप्रचार करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.मात्र कोपरगाव मतदार संघाची जनता सुज्ञ असून ती विकासाबरोबर आहे ती आ.आशुतोष काळे यांच्या बरोबर आहे.त्यामुळे अशा उपटसुंबांच्या नावाने कोल्हेंनी रोज दहा प्रसिद्धी पत्रक जरी प्रसिद्ध केले तरी काही फरक पडणार नाही.कारण सुज्ञ नागरिकांना जो अज्ञानी समजतो त्याच्या इतका अज्ञानी कोणीच नसतो नेमके हेच कोल्हेंना आजपर्यंत समजले नसल्याचा खोचक टोला राजेंद्र आभाळे यांनी लगावला आहे.