Homeकोपरगाव69 वी राष्ट्रीय शालेय स्तरावरील 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आत्मा मालिक...

69 वी राष्ट्रीय शालेय स्तरावरील 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात भव्य आयोजन – नंदकुमार सुर्यवंशी, आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष

कोपरगाव :- कीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ’69 व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलीच्या कबड्डी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

पुढे ते म्हणाले कि, सदर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत देशातील 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, नवोदय विद्यालय, केंद्रिय विद्यालय, सीबीएसई विद्यालय असे एकूण 39 संघ सहभागी होत असून, खेळाडू, पंच, प्रशिक्षक (कोचेस) व संघ व्यवस्थापक मिळून साधारणपणे 650 ते 700 सहभागी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.

ही स्पर्धा पूर्णतः मॅटवर खेळवण्यात येणार असून, यासाठी चार अत्याधुनिक मॅटची मैदाने सज्ज करण्यात आली आहेत. त्याचबरोबर खेळाडूंच्या सरावासाठी एक स्वतंत्र मेंट मैदान उभारण्यात आले आहे. सामने दिवस व रात्र या कालावधीत पार पडणार असल्यामुळे उत्तम व सुरक्षित प्रकाशव्यवस्थेची सोय करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी मैदानाच्या तीन बाजूंनी सुमारे 320 फूट लांबीची भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली असून, मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमींना सामने पाहता येणार आहेत. स्पर्धेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झालेली असून खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना. अजितदादा पवार, विधान परिषद सभापती मा. प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार महोदय यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाट व जिल्ह्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुली खेळाडूंसाठी नोंदणी कक्ष, स्वतंत्र चेंजिंग रूम, विश्रांती कक्ष, वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेले आहेत. पंचांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी एकूण 36 राष्ट्रीय दर्जाचे पंच नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच भारतीय खेल महासंघाचे पंकज द्विवेदी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व संघांसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच सुसज्ज व सुरक्षित मैदानी सुविधा अत्यंत सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. स्पर्धा न्याय्य, पारदर्शक व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व त्यांचे सर्व सहकारी काम पाहत आहेत तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक, संस्थेतील सर्व प्राचार्य व क्रीडाशिक्षक स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नियोजन करत आहे.

या शैक्षणिक वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने 13 राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खेळासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे महिला कबड्डीला चालना मिळणार असून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिमेला राष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख मिळणार आहे. या स्पर्धेकरता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी देशातील सर्वोत्तम कबड्डी खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!