
कोपरगाव : – श्री साईगाव पालखी सोहळा आयोजक, मुंबादेवी तरुण मंडळ, कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यन्त आयोजित केल्या जाणाऱ्या भक्तिमय सत्संग सोहळ्या अंतर्गत या वर्षी श्री नवनाथ कथा सार आयोजित केले आहे. मुख्य कार्यक्रमासोबत जे विविध उपक्रम आयोजित केले जातात, त्यात या वर्षी सनातन संस्था व गीता परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसा यावर आधारित प्रश्न मंजूषा साठी कोपरगांव शहर व परिसरातील विविध शाळांमधील गट-अ श्री रामरक्षा (५ वी ते ७ वी) साठी विदयार्थी २७४८ तसेच गट-ब श्री हनुमान चालीसा (८ वी ते ९ वी) साठी विदयार्थी २७४४ अशा सुमारे ५४९२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचा निकाल श्री ज्ञानेश्वर नगरी, तहसील मैदान , कोपरगांव येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य श्री. रमेशगिरीजी महाराज आणि आत्मा मलिक ध्यानपीठाचे परमपूज्य श्री. परमानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते तसेच विविध क्षेत्रातील संतगण आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. तसेच भक्ति शक्ति संस्कार संगम या शिबिरा अंतर्गत रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत शास्त्रोक्त पद्धतीने योगतज्ञ श्री प्रज्वल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून सूर्य नमस्कार करून घेण्यात आले तसेच त्यानंतर गीता परिवाराच्या वतीने श्रीमद भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे अनुपठण करण्यात आले.
या संस्कार शिबिरासाठी कोपरगांव शहर परिसरातील व आत्मा मलिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले तसेच कोपरगावातील योग प्रचार संस्थेच्या महिलांनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला. हा कार्यक्रमानंतर प्रश्न मंजूषा व सूर्यनमस्कार साठी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिबिर झाल्यानंतर सर्व विद्यार्थी, उपस्थित पालक व नागरिक यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने करण्यात आली.