
कोपरगाव : आयआयटी दिल्ली येथे पार पडलेल्या १० व्या राष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक्स व कोडिंग चॅम्पियनशिपमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत तिहेरी विजयाची नोंद केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले असून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची देशभर दखल घेतली जात आहे.
स्पर्धेतील कोडिंग हॅकॅथॉन प्रकारात प्रज्ञेश सानप, शार्विल गिरवालकर, अवनीश सावला, अनुरूप बजाज, शौनक जोशी व बनित खुराना या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि संघभावनेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. याचबरोबर सॉकर रोबोटिक्स गटात ‘सर्किट स्ट्रायकर’ संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. या संघात इयत्ता आठवीतील ईशान कोयटे व रुद्र राठोड यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या संघाला सर्वोत्तम अभियांत्रिकी डिझाइनसाठी मानाचा ‘टेकफ्लुएंसर ॲवॉर्ड’ही मिळाला.
तसेच लाईन फॉलो रोबोटिक्स स्पर्धेत इयत्ता नववीतील सुयश शिंदे याने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत राष्ट्रीय विजेतेपदासह ‘टेकफ्लुएंसर ॲवॉर्ड’ पटकावून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
या सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षक उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामागे शाळेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची प्रेरणा, कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्य समीर अत्तार यांचे प्रभावी मार्गदर्शन तसेच शिक्षकवर्गाचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यांचा मोठा वाटा आहे.
या यशाबद्दल कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या, “हे यश विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि नवकल्पनाशील विचारांचे फलित आहे. आधुनिक शिक्षणपद्धतीत तांत्रिक कौशल्य व प्रत्यक्ष अनुभवाला दिलेले प्राधान्य आज फलदायी ठरले आहे.” तर प्राचार्य समीर अत्तार यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सातत्य आणि संघभावना यामुळेच हा यशाचा मानाचा तुरा शक्य झाला. भविष्यातही ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करतील.”
समता इंटरनॅशनल स्कूलच्या या तिहेरी ऐतिहासिक विजयाने केवळ राष्ट्रीय स्तरावर ठोस ओळख निर्माण केली नाही, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्वाची क्षमता देखील स्पष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या जिद्द, नवकल्पना आणि उत्कृष्टतेच्या ध्यासातून घडलेली ही कामगिरी आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.