
संपादक – राजेंद्र तासकर
दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या संजय नगर, सुभाष नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, नियोजन शून्य भूमिगत गटारी मुळे ही समस्या वारंवार निर्माण होत असून यावर नगर पालिका प्रशासनाने कायम स्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,सुभाष नगर संजय नगर हा धारणगाव रस्त्याच्या उत्तर बाजूचा सखल भाग जवळच पूर्वी खंदक नाला होता त्यामुळे या नाल्याला शहरातील इतर भागातून जाणारे गटारीचे पाणी सोडले जाते पूर्वी खंदक नाला खोल होता मात्र आता अनेक ठिकाणी या नाल्यावर अतिक्रमण होऊन काही ठिकाणी नळ्या तर काही ठिकाणी माती टाकून बुजवला आहे त्यामुळे या नाल्याची पाणी वहन क्षमता कमी झाली.
मागील कार्यकाळात या भागात भूमिगत गटारीचे काम झाले अनेक ठिकाणी भूमिगत गटारी व रस्ते घराच्या उंबऱ्या पेक्षा उंच आहेत भूमिगत गटारी मध्ये कमी व्यासाच्या नळ्या वापरल्या आहेत त्यामुळे पाणी नळ्यामधून जात नाही मात्र या भागाचे नेतृत्व करणारे नगर सेवक ह्या भूमिगत गटारीचे काम होत असताना ब्र शब्द बोलत नव्हते.
नगर पालिका निवडणुकीचे वेध लागल्यावर अनेक जण धावून जातात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यावर नगर पालिका प्रशासनावर ताशेरे ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात मात्र ह्या भूमिगत गटारीचे काम होत असताना या विषयावर कोणी बोलले नाही मागील वर्षी देखील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते मात्र वर्षभर हा विषय मागे पडला त्यामुळे या भागातील आजी,माजी व भावी प्रतिनिधी जणू पुन्हा नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची वाट पहात होते असे वाटते.
या भागात गोरगरीब नागरिक राहतात नगर पालिकेचे कर भरतात मग या भागातील जनता नागरी सुविधे पासून वंचित का? झोपड पट्टी सुधार योजनेच्या अनेक योजना आहेत मात्र त्या योजनेचा निधी या भागात वापरण्या ऐवजी इतर ठिकाणी वळवला जातो असे न करता नगर पालिका प्रशासनाने या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना करावी असे या पत्रकात म्हटले आहे.