
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराण या ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजबांधवांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपोषणास व मुस्लिम समाजाने केलेल्या न्यायिक मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.यावेळी भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन,कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्याची घटना अतिशय निंदनीय असून,या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून कडक शिक्षा करावी,अशी मागणी केली.याबाबत तातडीने योग्य कारवाई व्हावी.कारण सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दूषित होते तसेच हे केवळ कुराणबद्दल नाही तर इतर कोणत्याही धर्माच्या बाबतीत घडू नये,असे मत अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी मुस्लिम धर्माच्या कुराण या पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील समाज कंटकांना तातडीने अटक करावी,खोटे आरोप करून कायदा हातात घेऊन धुडगूस घालणाऱ्यांवर तसेच प्रक्षोभक भाषण करून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,या प्रमुखमागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवार (२२ ऑगस्ट) पासून कोपरगाव येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप,शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.कोपरगाव तालुक्यात सामाजिक एकता,बंधुभाव व शांतता टिकणे महत्त्वाचे असून, कोल्हे कुटुंबीय तसेच भाजप,शिवसेना व रिपाइं सदैव मुस्लिम समाजाच्या सोबत उभे आहेत तसेच या आधी देखील वडिलकीच्या नात्याने कोल्हे कुटुंबाने शहराचे वातावरण वर्षानुवर्षे शांत राहण्यासाठी काम केलेले आहे. यापुढेही असेच सहकार्य राहील,अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले,कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या कुराण या पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून,आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कायमच सर्वधर्मसमभाव जोपासून कोपरगाव शहर व तालुक्यात सामाजिक एकता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे,विवेकभैय्या कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबीय आजही कोपरगाव तालुक्यात सामाजिक व धार्मिक सलोखा व शांतता राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवून विधायक काम करत आहेत. कोपरगावातील हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून सण,उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करतात;पण कोळगाव थडी येथे काही अज्ञात समाजकंटकांनी मुस्लिम बांधवांच्या कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना करून समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे,तो निषेधार्ह आहे.आज समाजकंटकांनी कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केली,अशा अपप्रवृत्तींवर वेळीच कडक कारवाई न केल्यास भविष्यात इतर धर्माच्या बाबतीतही असे प्रकार घडू शकतात.त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई होत नाही व उपोषणकर्त्या मुस्लिम समाजबांधवांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.

कोपरगाव शहर व तालुका हा शांतताप्रिय असून,सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी व कोल्हे परिवाराने कोपरगाव तालुक्यात हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्य अबाधित ठेवून तालुक्याचा कायापालट घडवून आणला आहे. मात्र,काही समाजकंटक धार्मिक ग्रंथाची विटंबना करून विनाकारण जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे,भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले यांनी केली.

भाजप,शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मौलाना हमीद राही,मौलाना मुख्तार,मौलाना रऊफ, मौलाना इरफान,रियाज शेख यांना मुस्लिम समाजाच्या या उपोषणास पाठिंबा दिल्याचे पत्र देण्यात आले. तसेच या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कडक शिक्षा करावी,अशा आशयाचे निवेदन प्रभारी तहसीलदार विकास गंबरे व नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना सादर करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष अल्ताफभाई कुरेशी,आरिफभाई कुरेशी , रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर,दीपक जपे,सद्दामभाई सय्यद, नसीरभाई सय्यद,शफिकभाई शेख,जितेंद्र रणशूर,सोमनाथ म्हस्के, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई,फकिर मोहम्मद शेख पहिलवान,शिवाजीराव खांडेकर,इलियासभाई खाटिक,एस. पी.पठाण, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे,ज्ञानेश्वर गोसावी,रंजन जाधव,पप्पू पडियार, प्रसाद आढाव,जगदीश मोरे,सागर जाधव,राजसिंग भाटिया,संतोष नेरे, संतोष साबळे,गोपी गायकवाड, अकबर लाला शेख, फिरोज पठाण, सिद्धार्थ साठे,विजय चव्हाणके,रोहित कनगरे,स्वप्नील मंजुळ,संदीप शिरसाठ, रवींद्र कुंदे,युवराज शिरसाठ,संजय खरोटे,निखिल जोशी,गौरीश लोहारीकर,वैभव सोळसे,अमोल बागुल,भैय्या नागरे, हाशमभाई पटेल, रहीमभाई शेख,अल्ताफभाई पठाण, अन्वरभाई शेख, सादिकभाई पठाण (मुर्शतपूर),शब्बीरभाई तांबोळी (कोळपेवाडी) आदींसह भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.