
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि वारी ग्रामपंचायतच्या विशेष प्रयत्नामुळे कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस (गाडी नं.११४१०) आणि दौंड ते निजामाबाद एक्सप्रेस (गाडी नं.११४०९) या गाडीला २३ ऑगस्ट २०२३ पासून अधिकृत थांबा मंजूर झाला आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कान्हेगाव,वारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त करत स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.दरम्यान,आज बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस कान्हेगाव रेल्वे स्टेशनवर आली असता वारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने या रेल्वेगाडीचे चालक,गार्ड व रेल्वे स्टेशन मास्तर यांचा सत्कार करण्यात आला.

कोपरगाव विधानसभामतदारसंघातील कान्हेगाव (वारी) रेल्वे स्टेशन हे मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे.कान्हेगाव व वारी या गावची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून,या ठिकाणी सोमय्या इंडस्ट्रीज ग्रुपचा गोदावरी बायोरिफायनरीजचा कारखाना आहे. ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक या भागातून मोठ्या प्रमाणात जात-येत असतात.कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर दौंड-निजामाबाद एक्सप्रेस (गाडी नं.११४०९), निजामाबाद-दौंड एक्सप्रेस (गाडी नं.११४१०),पुणे-मनमाड-निजामाबाद (गाडी नं.०१४०९), निजामाबाद- मनमाड-पुणे (गाडी नं.०१४१०), कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी नं.११०३९) व गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी नं.११०४०) या रेल्वेगाड्या थांबत नसल्यामुळे कान्हेगाव,वारी व पंचक्रोशीतील रहिवासी,शेतकरी, कामगार,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर वरील रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके पाटील,वारी ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सतीश कानडे,माजी तत्कालीन उपसरपंच मनीषा गोर्डे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्याकडे केली होती.

या मागणीवरून स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना याबाबत निवेदन देऊन कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस, दौंड ते निजामाबाद एक्सप्रेस तसेच पुणे-मनमाड- निजामाबाद,निजामाबाद-मनमाड- पुणेसह सर्व पॅसेंजर व एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती.या मागणीसाठी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, रेल्वे विभागाने निजामाबाद-दौंड एक्सप्रेस (गाडी नं.११४१०) व दौंड- निजामाबाद एक्सप्रेस (गाडी नं. ११४०९) या रेल्वेगाडीला कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर २३ ऑगस्ट २०२३ पासून अधिकृत थांबा मंजूर केला आहे.
निजामाबादहून दौंडकडे जाणारी ही एक्सप्रेस रेल्वे कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर दररोज दुपारी १२.०८ वाजता तर दौंड येथून निजामाबादकडे जाताना रोज रात्री ७.५८ वाजता थांबेल. निजामाबाद-दौंड एक्सप्रेस व दौंड-निजामाबाद एक्सप्रेसला कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर अधिकृत थांबा मंजूर करून प्रवाशांची गैरसोय दूर केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.तसेच स्नेहलताताई कोल्हे यांच्या अथक प्रयत्नामुळे निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस आणि परत दौंडहून निजामाबादला जाणाऱ्या एक्सप्रेसला कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर थांबा मंजूर झाल्यामुळे वारी गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तसेच रेल्वे प्रवाशांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस आज बुधवारी (२३ ऑगस्ट) दुपारी १२.०८ वाजता कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर आली असता वारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कान्हेगावचे रेल्वे स्टेशन मास्तर सी.बी.शर्मा,या रेल्वे गाडीचे चालक प्रधानजी कांटावाला, गार्ड तसेच गणेश आबक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश कानडे,सुभाषराव कर्पे,नामदेवराव जाधव,ज्येष्ठ महिला स्मिताताई काबरा, माजी सरपंच हिम्मतराव भुजंग,माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, दिलीप गडकरी, वसंतराव टेके, रावसाहेब (विकी) गोर्डे,माजी सरपंच बद्रीनाथ जाधव,रामप्रसाद (अण्णा) खवले,हरिभाऊ टेके,सर्जेराव टेके, सुखदेव मुसळे, सतीश मैराळ,मकरंद देशपांडे,गोपाल करवा,राजेंद्र वरकड, गणेश भाटी, भगवान पठाडे,राजेंद्र परदेशी,विश्वास तपासे,शब्बीर तांबोळी, विलास गोंडे पाटील,विजय जाधव,महेंद्र गडकरी,सिकंदर पठाण, सचिन भारूड, दादासाहेब संत,राजेंद्र पांडे आदींसह कान्हेगाव,वारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,रेल्वे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.