Homeकोपरगावनांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये, गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या...

नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये, गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या शेतीवर वरवंटा फिरेल-सौ. स्नेहलताताई कोल्हे.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव:पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येणा-या महापुरामुळे निफाड परिसरातील गावांना धोका पोहोचतो हे कारण पुढे करत नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास जास्तीचे वक्राकार दरवाजे बसवावे अशी निफाडकरांनी केलेली मागणीच शास्त्रोक्त नाही परिणामी गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतक-यांच्या शेतीस पाणीच मिळणार नाही तेंव्हा या बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये अशी मागणी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.ब्रिटीश काळापासून आणि स्वातंत्र मिळाल्यानंतर नांदुर मध्यमेश्वर बंधा-याबाबत जी स्थिती ठेवली तीच कायम ठेवावी व गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांचे नुकसान करू नये, अगोदरच तुटीचे खोरे,त्यानंतर २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा,जायकवाडी धरण भरावे म्हणून गोदावरी कालव्यांचा बंद केलेला ओव्हरफलो आणि आता दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा घातलेला घाट हे सगळं गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या मुळावर आले आहे तेंव्हा हा तुघलकी निर्णय तात्काळ थांबविण्यांत यावा असेही त्या म्हणाल्या.

त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की,उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे,त्यात पाण्याची समृध्दी वाढविण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवून नगर नाशिकसह मराठवाडयातील पाण्याचा प्रादेशिक वाद कमी करावा म्हणून मागणी करत त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यांस तत्कालीन शासनांस भाग पाडले.

वाढते शहरीकरण,औद्योगिकीकरणा मुळे गोदावरी खो-याचे कमी झालेले एकीकडे वाढविण्यांचे प्रयत्न सुरू असतांना गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन शेतीला पाणी वितरणाची व्यवस्था असतांना शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना दुष्काळाच्या खाईत ढकलण्याची प्रक्रिया नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसून करणार असेल तर ते कदापीही सहन केले जाणार नाही.

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे शासनात असतांना त्यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग,नाशिक पाटबंधारे विभाग व तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्यापुढे नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास आठ वक्राकार दरवाजे बसविण्याच्या कामास विरोध करून यामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांचे किती नुकसान होणार आहे हे वस्तुस्थितीदर्शक पटवून दिले होते त्यामुळे हे काम थांबवले होते.परंतु २००८ मध्ये ८ वक्राकार दरवाजे बसविण्यांत आल्याने पूर परिस्थितीत कालवे उघडे ठेवले तरी त्याचे पाणी कालव्यांना येत नव्हते ही वस्तुस्थिती असतांना आता आणखी १० वक्राकार दरवाजे बसविले तर यातुन किती गंभीर दुष्परिणाम होतील हे पाणी नियोजनकर्त्या जलसंपदा विभागनि वेळीच अभ्यासावे व आम्हां गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यावर अन्याय करू नये,वाढत्या बिगरसिंचन पाण्यामुळे गोदावरी कालव्यांना सध्याच पाटपाण्यांचे आर्वतन नीट होत नाही,टेलसह वरच्या भागातील शेतक-यांच्या शेती पिकांना पाणीच मिळत नाही, समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी,फळबागा,शेती पिके उध्दवस्त झाली आहे आणि आता पुन्हा त्यांच्यावर वरवंटा फिरविला जात आहे हे बरोबर नाही.तंत्रज्ञान प्रगत झालेले असतांना अगोदर त्याचा वापर करावा आणि नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा घाट तात्काळ बंद करावा असेही सौ स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!