
कोपरगांव : – संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथी निमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग दोन या पुस्तकाचे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. स्व.शंकरराव कोल्हे यांचे प्रत्येक क्षेत्रातील काम पुढच्या अनंत पिढयांसाठी मार्गदर्शनाचा ठेवा आहे.

या प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकुर, संजीवनी कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम . व्ही. नागरहल्ली, बी. फार्मसीचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, डी फार्मसीचे प्राचार्य प्रा. पेंडभाजे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य ए.आर मिरीकर,संजीवनी जुनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. एस. शेंडगे, प्रा.डॉ.समाधान दहीकर आदी उपस्थित होते.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे व्हीजनरी मॅन होते, दूरदृष्टीकोनातून त्यांनी जोपासलेला शब्दांचा वारसा मोठा आहे. सहकार, शिक्षण, सिंचन, कृषी, अर्थ, दुग्ध, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदि विविध क्षेत्रात त्यांना भविष्यकाळात निर्माण होणा-या विविध धोक्यांची अगोदरच जाणीव होत असे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील या विचारावर ते सतत काम करत त्यातुन त्यांनी विविध वर्तमानपत्रातुन लेख लिहीले त्याचे संकलन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग दोन या पुस्तकात आहे. श्रीक्षेत्र मंजूर येथील दत्तात्रेयरत्न, महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकाचे संपादन पत्रकार महेश जोशी, अक्षर जुळवणी अंतर्गत सजावट मयुर मधुकर जोशी सर्वेश ग्राफीक्स तर विचारांचे संकलन वीरेंद्र जोशी यांनी केले आहे.
या पुस्तकात सहकारी दुध संघाना सरकारी संरक्षणाची आवश्यकता, खुली अर्थव्यवस्था आणि विकसनशील देश, आर्थीक महासत्तेसाठी जिद्दच हवी, शेतक-यांच्या आत्महत्या पॅकेज देवुन थांबणार नाही त्यासाठी शाश्वत उपाय योजनांची आवश्यकता, जिल्हा बँकेमुळे कृषी क्रांती, अडचणीच्या शर्यतीतील साखर उद्योग, सहकारासमोर आव्हान खाजगीकरणाचं, ज्येष्ठांच्या भावना, अमृत महोत्सवी महाराष्ट्राचे विधीमंडळ, दुष्काळ निवारणासाठी शेततळी महत्वाची, शेती सहकार आणि ऋणानुबंध, सिंधुताई कोल्हे उत्तम संस्काराचे विद्यापीठ, आठवणीतले अधिवेशन, मनमिळावु व्यक्तीमत्व, सहकार आठवण, तुटीच्या गोदावरी खो-याला प्रतिक्षा पश्चिमेच्या पाण्याची, राज्याच्या राजकारणातील आधुनिक भगीरथ, शेतक-यांचा सच्चा हितकर्ता, संघर्षशील नेता, वैचारीक क्रांतीचे जनक या लेखांचा समावेश आहे. पुढच्या पिढीला माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचे ज्ञान व्हावे या हेतुने सदरचे पुस्तक तयार करण्यांत आले आहे. सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. गेल्या वर्षी (२०२४) दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त पहिल्या भागाचे प्रकाशन महंत रामगिरी महाराज, नामदार राम शिंदे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते झाले होते.